Join us  

अरेंज मॅरेजमध्ये मुलीने दिलेला धोका, 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडने केलेला नैराश्याचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 10:07 AM

अरेंज मॅरेजमध्ये मुलीने  धोका दिल्याचं किरण गायकवाडनं सांगितलं.

'देवमाणूस' फेम अभिनेता किरण गायकवाड हा कायम चर्चेत असतो. उत्तम अभिनयशैली आणि पर्सनालिटी यांच्या जोरावर किरणने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. किरणची खासकरुन तरुणींमध्ये विशेष क्रेझ आहे. त्यामुळेच त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. यामध्येच  एक मोठा खुलासा अभिनेत्यानं केला आहे. अरेंज मॅरेजमध्ये मुलीने  धोका दिल्याचं किरण गायकवाडनं सांगितलं.  

किरणने नुकतंच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये  नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले. यावेळी ठरलेलं लग्न अवघ्या ६ महिन्यात मोडलं आणि त्यानंतर नैराश्यात गेल्याचा खुलासा यावेळी त्याने केला. तो म्हणाला, 'माझं लग्न ठरलं होतं, हे सांगितलं पाहिजे की नाही मला माहीत नाही. अरेंज मॅरेज होतं आणि मी यानंतर काय करायचं हे नेमकं ठरवलं होतं. हे माझं घर असेल, इथे आमच्या नवरा-बायकोची फ्रेम असेल या सर्व माझ्या गोष्टी ठरल्या होत्या. लग्न ठरल्यापासून सहा महिन्यांचं आमचं नातं होतं. त्यामध्ये आम्ही दोन-तीन वेळा भेटलोही'.

पुढे त्यानं सांगितलं,  'यातच मला एका व्यक्तीचा मेसेज आला. माझ्यासोबत डबल डेटिंगचा प्रकार घडला होता. त्यामुळे मी नैराश्यात गेलो होतो. त्यावेळी माझ्या गोळ्याही सुरू झाल्या.  ही गोष्ट अगदी अलिकडेच 'चौक' सिनेमाचं शुटिंग सुरू होतं तेव्हा झालेली. सुदैवाने काम सुरू असल्यामुळे मी नैराश्यातून बाहेर येऊ शकलो. त्या मुलीचंं लग्नही झालं आणि मी ठरवलं की आता बास किती दिवस. मी यातून बाहेर पडलो'. हा प्रसंग सांगताना तो भावूक झाल्याचं दिसून आलं.  

टॅग्स :किरण गायकवाडसेलिब्रिटीमराठी अभिनेतालग्न