Join us  

असं हरवल आईच पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2017 3:26 PM

‘मोहन वाघांनी तब्बल ८३ नाटकांची निर्मिती केली.. त्यांचे १५,६४७ एवढे प्रयोग केले, पण त्यांची फक्त १५ नाटकंच व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी ...

‘मोहन वाघांनी तब्बल ८३ नाटकांची निर्मिती केली.. त्यांचे १५,६४७ एवढे प्रयोग केले, पण त्यांची फक्त १५ नाटकंच व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी ठरली. तरीही प्रत्येक कलाकाराला प्रयोगानंतर पाकीट द्यायलाच हवं, आजचं पाकीट उद्या द्यायचं नाही, हा त्यांचा नियम होता. नाटक चांगले पैसे मिळवून देवो अथवा नाही, पण त्यांनी कधीही कलाकारांना मानधनासाठी रखडून ठेवलं नाही. ही त्यांची शिस्त होती. सरतेशेवटी तेही कलाकारच. मी त्यांच्याकडे २० र्वष काम केलं. त्यांनी मला घडवलं. आता मोहनजी आपल्यात नाहीत, त्याचबरोबर ‘चंद्रलेखा’चं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. त्यामुळे यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा द्यावा, त्यांना कुर्निसात करावा, या उद्देशाने मी नाटक काढायचं ठरवलं. मला विनोदी नाटक काढण्यात रस नव्हता, लोकांना अस्वस्थ, सुन्न करणारी नाटकं मला आवडतात, त्याच धर्तीवर मी मोहनजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘आईचं पत्र हरवलं’ हे नाटक रंगमंचावर आणलं आहे,’ असं या नाटकाचे निर्माते सुरेंद्र दातार सांगत होते.ही नाटकाची प्रक्रिया वर्षभरापासून सुरू होती. दातार यांनी सुरुवातीला व. पु. काळे यांच्या ‘ही वाट एकटीची’ या कादंबरीवर नाटक करण्याचं ठरवलं होतं. त्यांनी काही जणांना ही कादंबरी विकत घेऊन वाचायलाही दिली. त्यापैकी बऱ्याच जणांनी ही गोष्ट कालबाह्य़ झाल्याचं सांगितलं. तरी दातार ऐकायला तयार नव्हतं. पण सरतेशेवटी ‘व.पुं.’ची कन्या स्वाती चांदोरकर यांनीही दातारांना या कादंबरीवर नाटक करू नका, असंच सुचवलं. या सगळ्या प्रवासादरम्यान दातार यांची गाठ नागपूरची युवा लेखिका-अभिनेत्री श्वेता पेंडसेशी पडली. श्वेताने दातारांकडून त्यांना कसं नाटक हवं आहे, हे जाणून घेतलं आणि एका दीर्घाकाचं नाटय़रूपांतर केलं. नाटकाची एकूणच पूर्वतयारी सुरू असताना ‘चंद्रलेखा’चे रंगभूषाकार कृष्णा बोरकर आणि क्लीनर प्रकाश परब यांनी दातारांना विनामूल्य सहकार्य करायचं ठरवलं. या सगळ्या गोष्टी सहजतेने जुळून आल्या आणि हे नाटक रंगमंचावर आलं.