Join us  

social media वर पोस्ट करण्याची मनःस्थिती खरंच असते?; माईंच्या निधनानंतर तेजस्विनीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 9:34 AM

Tejaswini pandit: सिंधू ताईंच्या निधनानंतर संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. यामध्येच अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची पोस्ट चर्चेत आली आहे. 

Sindhutai Sapkal Passed Away: 'अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं ४ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.२४ डिसेंबर रोजी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, सिंधुताईंवर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र, रुग्णालयात उपचार सुरु असतानाच (४ जानेवारी) रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. सिंधू ताईंच्या निधनानंतर संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. यामध्येच अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची पोस्ट चर्चेत आली आहे. 

"अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस....पोस्ट नाही केलं ? पटकन judge करतो ना आपण त्यांच्या social media वरुन माणसाला ? पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर social media वर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो ?! माझीही काहीशी अशीच अवस्था झाली.  रात्री ममता ताईच्या ph वरुन बातमी confirm झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते.  खूप वेळ ph वाजत होता. प्रतिक्रियेसाठी.काही जड छातीने उचलले, काही नाही उचलता आले....कारण ती वेळ खरंच नाजूक होती.

माई आणि मी रोज संपर्कात होतो का तर नाही....पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की  तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे ह्याचं त्यांना भान ही नसतं.  चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला....कधीच कुणाला नावाने हाक न मारता "बाळा" म्हणणार्‍या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या "मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस ! 

"अभिनेत्री" म्हणून ,एक तेजस्विनी पंडित आहे बरंका इथे अशी ओळख मला मी सिंधुताई सपकाळ ह्या चित्रपटाने दिली. अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले.अभिमान वाटतो की ज्या कलाक्षेत्रात मी काम करते , त्यातून माईंचं हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खारी चा का असेना पण मला वाटा उचलता आला. आणि एक व्यक्ति म्हणून त्यांचा तो अविस्मरणीय प्रवास मी screen वर जगू शकले त्यातून बरेच काही शिकू शकले ह्याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच ! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई.  महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला...! पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल. आणि तुमच्यावर आधारित असलेला चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील.लोकहो एक विनंती....

घाई घाई ने RIP लिहिण्याच्या ह्या जगात त्यांचंही एक कुटुंब आहे (आणि ते खूप मोठं आहे) ते अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे ह्याचा आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे... त्यांना वेळ द्या. Let them atleast have some time to mourn on a family members death.

तब्येत बरी नसल्यामुळे उद्या त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जाता येणार नाही पण ईश्वर चरणी प्रार्थना- माईंच्या आत्म्यास शांती लाभो. आणि ममता ताई, दीपक दादा, ममता बाल सदन च्या कुटुंबाला ह्या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो. ओम शांती. माई....- तुमचीच चिंधी, सिंधुताई आणि माई,"अशी पोस्ट तेजस्विनीने शेअर केली आहे.

दरम्यान, तेजस्विनी पंडितीने सिंधूताई सकपाळ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात तिने माईंची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या  निमित्ताने दोघींमध्ये अनेकदा गाठीभेटी झाल्या होत्या. त्यामुळे माईंच्या निधनाचा तेजस्विनीला जबर धक्का बसला आहे. तेजस्विनी प्रमाणेच अभिनेता सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी,संदीप पाठक अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माईंना आदरांजली वाहिली आहे. 

टॅग्स :सिंधुताई सपकाळतेजस्विनी पंडितसेलिब्रिटीसिनेमा