Pahalgam Terror Attack: काश्मीरमध्ये मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात अंदाधुंद गोळीबार करून २८ जणांची निर्घृण हत्या (Tourists Killed In Pahalgam) केली. त्यापैकी बहुतेक पर्यटक होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर सिनेइंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी खदखद व्यक्त केली. अनेकांनी आपला राग व्यक्त केला. आता अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरनं देखील या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करत हल्ल्याचा निषेध केला आहे.
केतकी माटेगावकरनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. तिनं लिहलं, निःशब्द ! किती वेळा राग व्यक्त करून स्वतःच शांत करायचे स्वतःला? किती वेळा rip लिहायचे आपल्याच लोकांसाठी आणि का??? किती दिवस चालणारे हे? किती वेळा आपल्या निर्दोष लोकांचा बळी जाणार? आणि हे शेजारी फक्त हात वर करणार की आम्ही काही केलं नाही? किती वेळा???? बास ना आता! बास! गोळ्या आणि बंदुका बनवण्या पेक्षा योग्य शिक्षणात तुमच्या देशाच्या लोकांना घडवा! त्यांना जरा माणुसकी शिकवा!", असं तिनं म्हटलं.
पुढे तिने हिंदूंना धर्म विचारून गोळ्या झाडल्या गेल्या त्याबद्दल लिहलं, "धर्माच्या नावाखाली काहीही करताय ते बास करा आता! त्रास देणे मारणे हे एवढच आयुष्य आहे का हो तुमचं? मुळात ज्या देवाला मानता, किंवा जिथे spirituality / अध्यात्म येतं तिथे मारहाण, अत्याचार, हिंसा कशी असू शकते ? अध्यात्म आणि धर्म ह्या दोन गोष्टी एकत्र करून त्याला कसही वापराल का? कुठल्याही धर्मात अध्यात्म तुम्हाला देहबुद्धी सोडायला शिकवतं ! आणि इथे निर्दोष देहांची विटंबना??? काय हे???? एक भारतीय एक हिंदू, या शब्दात तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या क्षणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे अनेक पर्यटक उपस्थित होते. त्यातील ६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर काहीजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारकडून सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आलेत.