Join us  

संजय दत्तची भूमिका साकारणार रणबीर कपूर - राजकुमार हिरानी

By admin | Published: January 26, 2016 4:11 PM

राजकुमार हिरानी हे संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविणार असून संजय दत्तच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे

चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविणार असून संजय दत्तच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.  या चित्रपटानंतर मुन्नाभाई मालिकेतील आगामी चित्रपट करण्याचा इरादा आहे. मुन्नाभाई मालिकेतील पुढच्या चित्रपटासाठी कथा मिळाली असली तरी त्यावर काम व्हायचे बाकी आहे, असे राजकुमार हिरानी यांनी सांगितले.  ‘साला खडूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागपूरभेटीवर आलेले राजकुमार हिरानी आणि अभिनेत्री रितिका सिंह यांनी ‘लोकमत भवन’ला भेट देऊन संपादकीय सहका-यांशी केलेली बातचीत..
चित्रपटाचे शीर्षक ‘साला खडूस’ आहे. त्याबाबत काय सांगाल?
राजकुमार हिरानी :  चित्रपट पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल  की, हे शीर्षक किती योग्य आहे?  प्रत्येकाच्या आयुष्यात ‘साला खडूस’ अशी व्यक्ती कधी ना कधी येत असते. तथापि, खडूस असला तरी आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याकामी  या व्यक्तीची भूमिका मात्र महत्त्वाची असते.  गुरु आणि शिष्य यांच्या दरम्यानच्या ‘टशन’ची ही कथा आहे.
 
चित्रपट बॉक्सिंगवर आधारित आहे?
राजकुमार हिरानी:  हो, हे खरं आहे; परंतु, आपल्या देशातील क्रीडा क्षेत्रची जी दशा आहे, त्यावर प्रकाश टाकण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. अनेक बॉक्सर्सच्या व्यथा आणि कथांनी प्रेरित हा चित्रपट असून शेवटच्या वीस मिनिटात प्रेक्षकांच्या डोळय़ात आनंदाश्रू तरळतात, हेच या चित्रपटाचे वैशिष्ट आहे.
राजकुमार हिरानी यांचा खास स्पर्श  या चित्रपटाला आहे काय?
राजकुमार हिरानी: निश्चितच.. हिरानी परिवाराचा हा चित्रपट आहे. अन्यथा, मी हा चित्रपट केलाच नसता. मेरी कोम हा चित्रपट मी पाहिला आहे. तथापि, आमचा चित्रपट यापेक्षा वेगळा आहे. ही फिल्म ‘फील गूड’ आहे, एवढेच सांगेन.
बॉक्सरचा ट्रेनर म्हणून माधवनची कशी निवड झाली?
राजकुमार हिरानी : मूळात माधवनच ही कथा माङयाकडे घेऊन आला होता. कथा आवडली.  या भूमिकेसाठी मी खूप विचार केल्यानंतरच थेट माधवनला या भूमिकेविषयी विचारले. त्यावर तो काही बोलला नाही. काही दिवसांनी माधवन अमेरिकेहून परतल्यानंतर मी त्याला पाहून थक्कच झालो. त्याचा नूरच बदलला होता. त्याचे शरीर सौष्ठवही नजरेत भरणारे झाले होते. या भूमिकेत जीव ओतेन, असं त्याने सांगितले आणि त्याची निवड झाली.
 
 
रितिका आपण या चित्रपटात कशा आल्या?
रितिका सिंह : या चित्रपटासाठी रियल लाईफ बॉक्सरचा शोध घेतला जात होता. एकेदिवशी माझ्याशी संपर्क करण्यात आला. ऑडिशन झाले आणि माझी निवड झाली. कथानक ऐकल्यानंतर  काय बोलावं हे सुचलंच नाही. ही भूमिका मला देऊ केली तेव्हा मी 18 वर्षाची होती. शुटिंग झाले तेव्हा 20 आणि चित्रपट प्रदर्शित होत असताना मी 22 वर्षाची आहे.
बॉलीवूड प्रवेशानंतर पुढे बॉक्सिंग की चित्रपट?
रितिका : याचा अद्याप विचार केलेला नाही; परंतु, बॉक्सिंगला प्राधान्य देईन. तथापि, चांगला चित्रपट मिळाल्यास विचार करीन.
स्पेशल स्क्रीनिंगच्या वेळी रडल्या होत्या म्हणो?
रितिका : खरं तर स्पेशल स्क्रीनिंगच्यावेळी मोठी गर्दी होती. मला आणि माधवनला बसायालाही जागा नव्हती. माझा परिवारही उपस्थित होता. सर्वानी चित्रपटाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. सर्वाना भावविवश पाहून माङया डोळय़ांतून अश्रू ओघळले.
 
 
मराठी चित्रपट अर्थपूर्ण..
मराठी चित्रपट संपला, असे पाच वर्षापूर्वी बोलले जायचे. आताच्या चित्रपटांनी कमालच केली आहे. अर्थपूर्ण चित्रपट मराठीतच होत आहेत. हिंदीत मात्र एवढेच सरस काम होत नाही, असे स्पष्ट मत राजकुमार हिरानी यांनी व्यक्त करीत मराठी चित्रपटांना दाद दिली.
जाहिरातीच्या दुनियेने शिकविले..
चित्रपटसृष्टीत येण्याआधीच जाहिरातींच्या दुनियेत होतो. तेथे भरपूर शिकायला मिळाले. माङया चित्रपटांची गती हा त्याचाच प्रभाव आहे, असेही राजकुमार हिरानी यांनी नमूद केले.