अतिशा नाईक (Atisha Naik) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठीसोबत हिंदीतही काम केले आहे. ‘घाडगे आणि सून’, ‘सुंदरी’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ अशा मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वांबद्दल सांगितले. यात त्यांनी रतन टाटां(Ratan Tata)बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
अतिशा नाईक यांनी नुकतेच आरपार ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वांबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, मला सर रतन टाटा खूप आवडतात. मला लागलीय ती गोष्ट. माझं असं म्हणणं होतं की परमेश्वराने कोणालातरी अमरत्व द्यावं. जे खरे लोक आहेत आणि जे तुमच्या अमरत्वाने बदलणार नाहीत. त्याच्यामध्ये सर रतन टाटा हे खूप पहिलं कदाचित शेवटचंही असेल. माझ्यासाठी हा असं नाव आहे. तो माणूस माझ्यासाठी एवढा मोठा आणि महत्त्वाचा आहे की, ते जे पायवाट चालले असतील त्याच्यातला धुळीचा कण जरी मला मिळाला तरी माझ्या आयुष्यातले खूप गोष्टी ह्या सुकर होतील. किंवा मला कळतील की असं नाही वागलं पाहिजे. आपण आपल्या परिमाणांमध्ये बसून जगतो ना तर ते त्यामुळे ते एक आवडतात.
''नंतर हे सगळं ना खूप खोटं वाटायला लागतं...''
त्यांनी पुढे सांगितले की, दुसरे बाबा आमटे आवडतात किंवा प्रकाश आमटे आवडतात. की ज्यांनी काम करताना स्वतःला झोकून दिलंय. असे काही लोक मला आवडतात. त्यामुळे माझे म्हणणं आहे खरेपणाच कळतो की नाही. तुमचं कामच दिसतं की नाही. कोणी म्हणणार आहे का प्रकाश आमटे का नाही सिल्कच्या झब्ब्यात आले तिकडे पुरस्कार घ्यायला. शक्य आहे की त्यांना. मोठ्या मोठ्या गाड्या देतील त्यांना. पण साधेपणातच जो माणूस जगला त्याला नंतर हे सगळं ना खूप खोटं वाटायला लागतं. क्षुल्लक वाटायला लागतं.