Join us  

लवकरच उलगडणार ' रात्री'चे रहस्य, मालिका घेणार निरोप!

By admin | Published: October 04, 2016 9:13 AM

नेहमीपेक्षा वेगळया कथानकामुळे अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली'रात्रीस खेळ चाले' ही मालिका आता निरोप घेणार असून दिवाळीच्या मुहुर्तावर आणखी एक रहस्यमय मालिका येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - नेहमीपेक्षा वेगळया कथानकामुळे 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. नाईकांच्या वाड्यासह दत्ता, सरिता, अभिराम, सुशल्या, माधव, विश्वासराव या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. या वाड्यातील गूढ घटनांमागचा खरा गुन्हेगार कोण हे अद्याप समजले नसले तरी लवकरच सर्व प्रश्नांची उकल होणार आहे. अतिशय उत्कंठावर्धक वळणावर पोचलेली ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याऐवजी आदिनाथ कोठारे- तेजस्विनी पंडित यांची मुख्य भूमिका असणारी ' हंड्रेड डेज' हा मालिका येणार आहे. २२ ऑक्टोबरला ' रात्रीस खेळ चाले' चा शेवटचा भाग प्रदर्शित होणार असून २४ ऑक्टोबरपासून नवी मालिका सुरू होणार आहे. 
('रात्रीस खेळ चाले'मध्ये ट्विस्ट? नव्या पाहुण्याचे आगमन)
  •  भूत, प्रेत, आत्मा, पिशाच्च या कथानकामुळे पहिल्या भागापासून ही मालिका चर्चेत आली. पण अशा घटनांमधून कोकणची बदनामी होत असल्याचा आरोप झाल्यामुळे या मालिकेचा ट्रॅक बदलण्यात आला. ट्रॅक बदलल्यानंतरही ही मालिका रंजक वळणावर असताना आता ती प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत कोकणातील नाईक कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. या कुटुंबाभोवती एक गूढ असून, काही अदृश्य शक्तींमुळे ब-याचवर्षांपासून या कुटुंबात कुठलेही मंगल कार्य झाले नसल्याचे त्यात दाखवण्यात आले आहे.कोणतेही प्रथितयश कलाकार नसतानाही या मालिकेतील व्यक्तिरेखा आज घराघरांत लोकप्रिय ठरल्या असून ही मालिका आता दोनशे भागांच्या टप्प्यावर उभी आहे. मात्र लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून दिवाळीच्या मुहर्तावर येणा-या ' हंड्रेड डेज' या रहस्यमय मालिकेद्वारे आदिनाथ कोठारे पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.