तामिळनाडूसह दक्षिण भारतात पेटलेल्या भाषावादाचं लोण आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचलं आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी भाषावादावरून तामिळनाडूतील नेत्यांनी घेतलेली भूमिका ही ढोंगबाजी असल्याचा आरोप केल्यानंतर आता अभिनेते प्रकाश राज यांनी पवन कल्याण यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तसेच पवन कल्याण यांच्या जनसेनेची आता भजन सेना झाली आहे असा टोला लगावला आहे.
नेते आर्थिक लाभ मिळवण्यासाठी तामिळ चित्रपटांचं हिंदीमध्ये डबिंग करण्याला परवानगी देतात. भाषेला मात्र विरोध करतात, अशी टीका पवन कल्याण यांनी केली होती. तसेच देशाच्या अखंडतेसाठी भारताला तामिळसह अनेक भाषांची आवश्यकता आहे, असे पवन कल्याण म्हणाले होते.
पवन कल्याण यांच्या या वक्तव्यावर डीएमकेकडून जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता प्रकाश राज यांनीही वादामध्ये उडी घेतली आहे. प्रकाश राज म्हणाले की, हा विषय अन्य कुठल्या भाषेचा द्वेष करण्याचा नाही तर आपल्या मातृभाषेला वाचवण्याचा आहे. याशिवाय प्रकाश राज यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यातूनही त्यांनी पवन कल्याण यांना टोला लगावला आहे. त्यात त्यांनी लिहिले की, निवडणुकी आधी ही जन सेना होती. आता ती भजन सेना झाली आहे.
दरम्यान, आपल्या जनसेना पक्षाच्या वर्धापनदिनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना पवन कल्याण म्हणाले की, देशाच्या अखंडतेसाठी बारताला तामिळसह इतर भाषांचीही आवश्यकता आहे. यावेळी डीएमके किंवा स्टॅलिन यांचं नाव न घेता पवन कल्याण म्हणाले की, तामिळनाडूमध्ये हिंदी भाषा लादण्याचा विरोध करत आहेत. या गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं. कारण जर यांना हिंदी नको असेल तर कमाईसाठी तामिळ चित्रपटांना हिंदीमध्ये का डब करतात. त्यांना बॉलिवूडचा पैसा हवा असतो, मात्र हिंदीचा स्वीकार करण्यास मात्र ते नकार देतात. हा कशाप्रकारचा तर्क आहे? एकीकडे उत्तर प्रदेश, बिहारमधून मजूर बोलवायचे, मात्र दुसरीकडे त्यांची भाषा स्वीकारण्यास नकार द्यायचा, ही बाब अयोग्य आहे, असा टोला पवन कल्याण यांनी लगावला होता.