Join us  

तिरुपतीमधील लाडू वादावर रजनीकांत यांची प्रतिक्रिया, म्हणाले - "माफ करा, मला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 1:04 PM

तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडू वादाचा मुद्दा ठरत आहे.

Rajinikanth On Tirupati Laddu Controversy : देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडू वादाचा मुद्दा ठरत आहे. तिरुमला तिरुपती मंदिरात दिल्या जात असलेल्या लाडू प्रसादात जनावरांची चरबी आणि माशांचे तेल वापरण्यात आल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला. यानंतर आता यावरून देशभरात चर्चांना उधाण आले आहे.  धर्मप्रमुखांपासून ते राजकीय नेते ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.  या वादावर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी काय म्हटलं, ते आपण जाणून घेऊया. 

रजनीकांत हे नुकतंच चेन्नई विमानतळावर स्पॉट झाले. यावेळी पापाराझींनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढले. यावेळी माध्यमांनी तिरुपती मंदिरातील लाडू वादावर प्रश्न विचारले असता रजनीकांत यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. ते हसत म्हणाले, "मला माफ करा, मला कोणतीही कमेंट करायची नाही".  रजनीकांत हे नेहमीप्रमाणे यावेळीही वादापासून स्वत: ला लांब ठेवताना दिसून आले.

दरम्यान,  लाडूच्या वादानंतर आता सोमवारी (२३ सप्टेंबर) तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले. या पूजेवेळी मंत्रोच्चाराद्वारे भगवान व्यंकटेश्वर स्वामींची क्षमा मागण्यात आली.  शिवाय याप्रकरणी टीटीडीचे महाव्यवस्थापक पी मुरली कृष्णा यांनी एआर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेड, दिंडीगुल विरुद्ध पूर्व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी, सरकारने पोलीस अधिकारी उत्तम त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी स्थापन केली आहे. जी लाडू भेसळ प्रकरणाची चौकशी करेल.

रजनीकांत यांच्याबद्दल बोलायचंं झालं तर ते चित्रपटांसोबतच अध्यात्मावर भर देताना दिसून येतात. काही दिवसांपुर्वीच ते चारधाम यात्रेला गेले होते. मराठी कुटुंबात जन्माला आलेल्या रजनीकांत यांना साऊथमध्ये देवाचा दर्जा दिला जातो. रजनीकांत यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच ते 'लाल सलाम' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता लवकरच ते Veetaiyan या चित्रपटात दिसणार आहे.

टॅग्स :रजनीकांततिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटसेलिब्रिटी