प्रत्येकाची प्रेमकथा ही सरळ, सोपी नसते नाही का? बऱ्याचदा आपला जीव ज्या माणसावर जडला आहे, त्याच्यासोबत लग्नगाठ बांधताना, सहजीवनाचा प्रवास अगदी सोपा होत जातो कुठलेही अडथळे न येता, कुठल्याही विरोधाला सामोरं न जाता अगदी निर्विघ्नपणे पार पडतो. पण काही लव्ह स्टोरी अशा असतात ज्यांना अग्नीदिव्यातून जावे लागते. सुरुवातीपासूनच अशक्य वाटणारी सरकार - सानिकाची प्रेमकथा अखेर सत्यात उतरली.
सरकार सानिका देखील अनेक कट - कारस्थानाला सामोरे गेले. सई, सर्वेश आणि पंकजा यांनी सरकार सानिकामध्ये दुरावा आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले, त्यांना वेगळे करण्यासाठी अनेक योजना आखल्या. परंतु खऱ्या प्रेमापुढे त्यांचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने दोघे लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले गेले. पण आता खरी परीक्षा सुरु झाली असे म्हणायला हरकत नाही.
साहेबरावांसमोर आता सरकारचे सत्य आल्याने ते सरकार - सानिकाच्या लग्नाच्या काय तर दोघांच्या प्रेमाच्या देखील विरोधात गेले आहेत. दोन गावामधील वैर पूर्णतः संपून जावे अशी एकीकडे सानिकाची इच्छा तिने सरकारकडे व्यक्त केली तर दुसरीकडे साहेबराव याच वैरामुळे दोघांचा जीव घेण्यासाठी देखील मागे पुढे बघणार नाही असे दिसून येते आहे. येत्या मालिकाच्या भागांमध्ये साहेबरावांचा राग टोक गाठणार आहे, कारण जिवंत सानिकाचं ते श्राद्ध घालणार आहेत आणि हे सानिकाला कळल्यावर पुढे नक्की काय होईल ? ती काय निर्णय घेईल ? हे येत्या भागांमध्ये कळेलच.