Join us  

'अंतरपाट' मालिकेत नवा ट्विस्ट, गौतमी-क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर येणार जान्हवीसमोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 1:26 PM

'अंतरपाट' (Antarpat Serial) मालिकेत एक रंजक वळण येणार आहे. गौतमी आणि क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर जान्हवीसमोर येणार आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील 'अंतरपाट' (Antarpat Serial) मालिका काही दिवसांपासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. गौतमी-क्षितिजचा लग्नसोहळा, घटस्फोटाचा आलेला ट्विस्ट, जान्हवीची एन्ट्री या सर्वांमुळेच मालिकेला कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता पुन्हा एकदा मालिकेत एक रंजक वळण येणार आहे. गौतमी आणि क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर जान्हवीसमोर येणार आहे.

गौतमी आणि क्षितिजमध्ये मैत्रीचे नाते बहरते आहे. गौतमीची आयुष्यात एन्ट्री झाल्यानंतर हतबल, निराश असलेला क्षितिज पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगू लागलेला पाहायला मिळत आहे. सर्व काही सोडून दिलेल्या क्षितिजने मुंबईत एक डीलदेखील क्रॅक केली आहे. आपल्या मुलाने मोठे यश संपादन केल्याने राजाराम यांचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि ते एका पार्टीचे आयोजन करतात. या पार्टीसाठी गौतमीने तिच्या कुटुंबियांनादेखील आमंत्रित केलेलं असतं. पार्टीदरम्यान क्षितिजचं लग्न गौतमीसोबत झाल्याचं सत्य जान्हवीसमोर येतं. त्यामुळे आता पुढे काय घडणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. 

मालिकेतील या ट्रॅकबद्दल जान्हवी म्हणजेच प्रतीक्षा शिवणकर म्हणाली,"जान्हवीने एवढी वर्षे क्षितिजवर प्रेम केलंय. त्यांनी एकत्र सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती. क्षितिजचं लग्न झाल्याचं सत्य जान्हवीला कळल्यापासूनच तिचं मानसिक खच्चीकरण सुरू झालंय. पण नुकतीच आयुष्यात आलेली एक चांगली मैत्रीण गौतमीच आपल्या प्रियकराची पत्नी आहे हे कळल्यावर तिचं आणखी खच्चीकरण झालंय. त्यामुळे आता यापुढे काय करायचं असा मोठा प्रश्न तिला पडलाय. तिच्यासमोरचे सर्व दरवाजे आता बंद झाले आहेत". 

टॅग्स :कलर्स मराठी