Join us

'Negative रोल जरी करत असलो, तरी सुद्धा...'; मिलिंद गवळींची ती पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 2:00 PM

Milind gawali: अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेता मिलिंद गवळी सोशल मीडियावर कायम त्यांच्या भुमिकेविषयी व्यक्त होत असतात. यात अलिकडेच त्यांनी अनिरुद्धच्या स्वभावावर आधारित एक पोस्ट लिहिली आहे.

 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही मालिका सध्याच्या घडीला लोकप्रिय मालिकांपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. या मालिकेत अरुंधतीला जितकं प्रेक्षकांकडून प्रेम मिळतंय. तितकाच तिरस्कार अनिरुद्धला सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेता मिलिंद गवळी सोशल मीडियावर कायम त्यांच्या भुमिकेविषयी व्यक्त होत असतात. यात अलिकडेच त्यांनी अनिरुद्धच्या स्वभावावर आधारित एक पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत येत आहे.

"६०० भाग पूर्ण झाले..."आई कुठे काय करते" या मालिकेतल्या संपूर्ण teamचं खूप खूप अभिनंदन. तुम्हा मायबाप प्रेक्षकांचे अगदी मनापासून खूप खूप आभार. प्रेक्षकांनी ही मालिका अगदी सुरुवातीपासूनच डोक्यावर घेतली, पहिल्या एपिसोड पासूनच अरुंधती देशमुख ही मनाला भावली, प्रेक्षकांच्या मनात तिने घर केलं, आणि अगदी 600 एपिसोड नंतर सुद्धा मनात रुजली, बहरली, फुलली. पहिल्याच एपिसोडमध्ये अनिरुद्ध देशमुख ती उशिरा घरी येते म्हणून तिला घराच्या बाहेर काढतो, तो प्रसंग पाहून प्रेक्षकांबरोबर माझं स्वतः ही मन हळहळलं,मला स्वतःला अनिरुद्ध देशमुख कसा आहे तो तेव्हाच कळला. पहिल्या एपिसोड पासून ते आता 600 एपिसोडपर्यंत ह्या अनिरुद्ध देशमुख वर अक्षरश: शिव्यांचा वर्षाव झाला, झाला काय होतोच आहे", असं मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं.

पुढे ते म्हणतात, "जितके लोक अरुंधती वर प्रेम करतात तितकाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त अनिरुद्ध देशमुखचा तिरस्कार करतात.मला काय त्याचा फार आनंद होतो अशातला भाग नाहीये, वाईट वाटतं, कोणाला शिव्या खाणं आवडतं,अरुंधती बरोबर वादावादीचे भांडणाचे सीन झाल्यावर खरंच मनाला दुःख होतं, पण Somebody has to do this dirty job of playing this bloody Anirudh Deshmukh who is useless worthless talks nonsense. परत पण या ६०० एपिसोड्समध्ये अनिरुद्ध देशमुखची खूप चांगली बाजू सुध्दा प्रेक्षकांच्या समोर आली. मुलांवरचं प्रेम, त्यांच्या भविष्याची काळजी, घर चालवण्यासाठी कष्ट करणे, आई-वडिलांवरचं प्रेम , चूक कबूल करणं, कुटुंबाला महत्व देणं,खूप अशा त्याच्या चांगल्या गोष्टी सुद्धा समोर आल्या. आई कुठे काय करतेची पटकथा नमिता वर्तक लिहिते, ती जेव्हा मला म्हणाली कि, मला तुझ्यामध्ये अनिरुद्ध दिसतो. नंतर मी आत्मपरिक्षण करायला सुरुवात केली,आणि खरंच आश्चर्याची गोष्ट म्हणजे, माझ्यात अनिरुद्ध देशमुख कुठून कुठून भरलाय, तो मलाच कधी दिसला नव्हता, आत कुठेतरी दडून बसला होता.हळूहळू डोकं बाहेर काढायला लागला. नमिताचे खूप आभारी, मला अनिरुद्ध दिल्या बद्दल आणि माझ्यातला अनिरुद्ध दाखवल्याबद्दल. कारण मला माहिती आहे जितका माझ्यातला अनिरुद्ध राक्षस आतून बाहेर येईल तितकाच तो मला एक चांगला माणूस बनवत जाईल. कदाचित म्हणून प्राणसाहेब, अमरीशपुरी, अमजद खान, राजशेखर , निळूभाऊ फुले ही माणसं अतिशय चांगली होती, प्रेमळ होती, सज्जन होती.त्यांच्यात आतला राक्षस पडद्यावर बाहेर आला आणि मनाने ते निर्मळ आणि स्वच्छ झाले. Anirudh Deshmukh हा Negative role जरी मी करत असलो, तरी सुद्धा माझ्यातली Positivity कधी ही कमी होणार नाही..६००च्या पुढे."

दरम्यान, मिलिंद गवळी सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ते जाहीरपणे त्यांची मत मांडत असतात. त्यांच्या आजपर्यंत अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे ही पोस्टदेखील चर्चेत आली आहे. 

टॅग्स :मिलिंद गवळीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार