कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' (Aai Tuljabhawani ) या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 'आई तुळजाभवानी'ची गाथा परिस्थितीशी लढण्याचं बळ देणारी आहे. त्यामुळे या मालिकेच्या प्रेक्षकवर्गात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मालिकेत नुकतचं खंडेरायाच्या म्हाळसाने आई तुळजाचं महाराष्ट्रात स्वागत केलेलं पाहायला मिळालं. तसंच म्हाळसाच्या सोबतीने तुळजाभवानी गावकऱ्यांवर आलेलं संकट दूर करताना दिसून आली. अशातच आता मालिकेत पुन्हा एकदा एक रंगतदार वळण आलं आहे. 'आई तुळजाभवानी' आणि महालक्ष्मी या दोन सख्यांची भेट होणार आहे.
'आई तुळजाभवानी' या मालिकेत लक्ष्मी तुळजा भवानीला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची कहाणी सांगताना दिसणार आहे. असूराच्या अत्याचारामुळे सगळे हैराण झाले आहेत. लोकांना आता कशावरही विश्वास नाही. त्यांचा हरवलेला विश्वास परत मिळवून द्यायला आणि त्यांना सुखाचे दिवस दाखवायला तुळजा महाराष्ट्राचं आल्याचं ती लक्ष्मीला सांगते.
तुळजा लक्ष्मीला तिच्या भक्तांना मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी भक्तिभावाने तिचं पूजन करायला सांगते. तसेच भविष्यात ते व्रत माझ्या आणि सगळ्याच आदिशक्तीच्या भक्तांना फलदायी ठरणार असल्याचं सांगते. पुढे भवानी तिचे आभार मानते आणि त्या व्रतामुळे लोकांमध्ये समृद्धी येईल याची ग्वाही देते.