Join us  

Exclusive: 'हिरो आहे मग पैशांची कमी नसेल...', मानधनाच्या मुद्द्यावर आशय कुलकर्णी स्पष्टच बोलला

By ऋचा वझे | Published: August 28, 2024 12:13 PM

मालिकाविश्वातील एकंदरच या परिस्थितीवर आशयने 'लोकमत फिल्मी'शी सविस्तर संवाद साधला. 

अभिनेता आशय कुलकर्णीने (Aashay Kulkarni) 'माझा होशील ना' मालिकेतून मराठी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. यानंतर त्याने अनेक मालिका, सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या. नुकतंच तो एका पोस्टमुळे चर्चेत आला. काही दिवसांपूर्वी एका मालिकेत काही एपिसोडमध्ये काम केल्यानंतर त्याला वेळेत मानधन मिळालं नाही. याविरोधात त्याने सोशल  मीडियावर आवाज उठवला होता. सोशल मीडिया पोस्ट करताच त्याला मानधन मिळालं. मालिकाविश्वातील एकंदरच या परिस्थितीवर आशयने 'लोकमत फिल्मी'शी सविस्तर संवाद साधला. 

मालिकेत काम करताना कलाकारांना ९० दिवसांनी मानधन मिळायला सुरुवात होते. पण यातही जेव्हा दिरंगाई होते तेव्हा मात्र कलाकारांनाही अडचणीचा सामना करावा लागतो. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत आशय म्हणाला, "याआधी मला कायम वेळेत मानधन मिळालं आहे. इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मला पाठपुरावा करावा लागला. आधीच मालिकेचे पैसे 90 दिवसांनी दिले जातात. पण जेव्हा याचेच 120 कधी 140 दिवस होतात तेव्हा काय करायचं? हिरो हिरॉईन आहेत यांना पैशांची काही कमी नसते असंच लोकांना वाटतं. पण आम्हालाही आमचे महिन्याचे खर्च असतात. जर कलाकार प्रामाणिकपणे काम करतो तर मग पैसेही वेळेतच मिळणं अपेक्षित आहे."

तो पुढे म्हणाला, "मी इतर काही अप्रतिम प्रोडक्शनमध्ये काम केलंय. आता यांचा काही प्रॉब्लेम झाला असेल पण त्यामुळे माझं जग थांबू शकत नाही. ते मला चालवायचंच आहे. त्यामुळे टेलिव्हिजनमध्ये सर्वस्वी वाईटच अनुभव आहे असं नाही. ही भीती मी कोणालाही घालणार नाही. प्रत्येकाला आपला वेगळा अनुभव येणार आहे."

आशय कुलकर्णी सध्या 'सुख कळले' मालिकेत काम करत आहे. याआधी तो 'पाहिले न मी तुला' मालिकेत झळकला. तसंच स्टार प्रवाहच्या 'मुरांबा' मालिकेत तो काही एपिसोड्ससाठी दिसला. 'सुख कळले' मधील त्याची आणि स्पृहाची जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस पडली आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारसोशल मीडियाटेलिव्हिजन