Join us  

'अबीर गुलाल' नाट्यमय वळणावर; शुभ्रा आणि अगस्त्यचा पार पडणार साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 3:01 PM

'अबीर गुलाल' (Abeer Gulal) या मालिकेत नाट्यमय वळण आलं आहे. शुभ्रा आणि अगस्त्यचा थाटामाटात साखरपुडा पार पडणार आहे.

'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'अबीर गुलाल' (Abeer Gulal) या मालिकेत नाट्यमय वळण आलं आहे. शुभ्रा आणि अगस्त्यचा थाटामाटात साखरपुडा पार पडणार आहे. अगस्त्यसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्यास शुभ्रा आता सज्ज आहे. श्रीने आतापर्यंत अगस्त्यकडे आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. त्यामुळे शुभ्रा आणि अगस्त्यचा साखरपुडा होताना पाहून तिला मोठा धक्का बसणार आहे.

'अबीर गुलाल' मालिकेत श्रीला तिचं खरं सत्य कळल्यानंतर शुभ्राला त्रास होऊ नये म्हणून ती तिच्या हक्काचं घर सोडून जाते. श्री हरवल्यामुळे अगस्त्य मात्र हैराण होतो आणि त्याच्या आईला म्हणतो,"जोपर्यंत श्री सापडणार नाही तोपर्यंत मी साखरपुड्याला उभा राहणार नाही". त्यामुळे साखरपुडाही पुढे ढकलला जातो. अगस्त्य रात्रभर फिरून श्रीला शोधतो आणि तिला घरी घेऊन येतो. 

दुसरीकडे, शुभ्राने मागवलेले डीएनए टेस्टचे रिपोर्ट्स समोर येतात आणि श्री ही गायकवाडांची खरी मुलगी असल्याचं शुभ्राला कळतं आणि तिला मोठा धक्का बसतो. अशातच श्री घरी परत आल्यानंतर शुभ्रा आणि अगस्त्यचा साखरपुडा पार पडतो. आपलं अगस्त्यवर प्रेम असल्याचं श्री मात्र मनातच ठेवते. दरम्यान शुभ्रा आणि अगस्त्यच्या लग्नात कोणतंही विघ्न येणार नाही, असं प्रॉमिस श्री सुलोक्षणा निंबाळकरांना करते. आता शुभ्राचा नवा डाव काय असणार? अगस्त्य आणि शुभ्राच्या लग्नात नवं विघ्न येणार का? की श्री आणि अगस्त्यच लग्नबंधनात अडकणार का, हे पाहणे कमालीचं ठरणार आहे.