Join us

'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 6:52 PM

शीर्षकगीतांचे जादूगार मंगेश कुलकर्णी यांनी अखेरचा श्वास घेतलाय (mangesh kulkarni)

'आभाळमाया', 'वादळवाट' यांसारख्या लोकप्रिय मालिकांची शीर्षकगीतं त्यांच्या लेखणीने अजरामर करणारे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन झालंय. श्रीवर्धनला त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं समजतंय.  मंगेश कुलकर्णी यांच्या निधनाने मालिकांच्या शीर्षकगीताचा जादूगार गमावल्याची भावना मराठी कलाकारांच्या मनात आहे. मंगेश कुलकर्णी यांनी गीतकार आणि पटकथाकार म्हणून त्यांची कारकीर्द गाजवली आहे.

मंगेश कुलकर्णी हे केवळ उत्कृष्ट गीतकारच नव्हते तर त्यांनी पटकथाकार म्हणूनही लोकप्रियता मिळवली. काही वर्षांपुर्वी टि.व्ही.वर गाजलेल्या 'लाईफ लाईन' या मालिकेची पटकथा मंगेश कुलकर्णी यांनी लिहिली होती. विजया मेहतांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं. इतकंच नव्हे तर शाहरुख खानच्या गाजलेल्या 'येस बॉस' या चित्रपटाच्या पटकथालेखनाही जबाबदारी मंगेश कुलकर्णी यांनी सांभाळली होती.

'वादळवाट' आणि 'आभाळमाया' या मालिकांच्या शिर्षकगीतांनी मंगेश कुलकर्णींना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. इतकी वर्ष उलटली तरीही या दोन्ही मालिकांची शिर्षकगीतं आजही लोकांच्या मनात घर करुन आहेत. आपल्या मोबाईलची रिंगटोन म्हणुन ही दोन्ही गीतं ठेवली असल्याची अनेक उदाहरणं देता येतील. ही शीर्षकगीतं लोकप्रिय होण्यामागे मंगेश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या शब्दांची किमया आहे. मंगेश कुलकर्णी यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वातील मान्यवर त्यांना श्रद्धांजली देऊन शोक व्यक्त करत आहे,

 

टॅग्स :झी मराठीमराठीमराठी गाणीमराठी अभिनेता