सलमान खान (salman khan) हा वयाची ५५ वर्ष ओलांडली तरीही सिंगल आहे. सलमान आता लग्न करेल की शक्यता कमी झालीय. पण वयाची पस्तीशी ओलांडलेला एक अभिनेता आता लग्नासाठी उतावीळ झालाय. इतकंच नव्हे तर "मस्करी मस्करीत लग्नाला चांगलाच उशीर झाला", याची जाणीव त्या अभिनेत्याला आहे. त्यामुळे ३९ व्या वर्षी हा अभिनेता आता मुलीच्या शोधात आहे.हा अभिनेता आहे बॉलिवूड आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय स्टार करण वाही. (karan wahi)
करण वाहीने लग्नाबद्दल मांडलं स्पष्ट मत
करण अलीकडेच भारती सिंग आणि हर्ष लंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. यावेळी करणने लग्नाबद्दल त्याचं मत व्यक्त केलं. करण म्हणाला की, "यावर्षी लग्न करायचं. आता खूप झालं. मी ३९ वर्षांचा झालोय. मला वाटतंय मस्ती मस्तीमध्ये थोडासा उशीरच झालाय लग्न करायला. वयाच्या ३५ वर्षापर्यंत लग्न केलं पाहिजे. एकदा पस्तीशी ओलांडली की तुम्ही स्वतःमध्ये मग्न होऊन जाता. त्यानंतर दुसर्या कोणासोबत आयुष्य घालवण्यासाठी तडजोडी कराव्या लागतात."
"सध्या मी लग्नासाठी मुलगी शोधतोय. आता लग्नासाठी मुलगी शोधण्यात मी हुशार नाही. त्यामुळे घरचेच माझ्यासाठी स्थळ बघत आहेत. लग्न थाटामाटात पार पडावं अशी माझी इच्छा आहे. मला वाटतं की, प्रत्येक व्यक्तीने लग्न करणं गरजेचं आहे. मित्रांच्या सल्ल्यामुळे मी टिंडर अॅप वापरुन बघितलं. परंतु मी अभिनेता करण वाही आहे, हे सर्व मुली ओळखतात." करणचं बोलणं ऐकून भारती सिंगही उत्सुक झाली. करणसोबत लग्न करण्यास कोणी उत्सुक असल्यास त्यांनी आम्हाला मेसेज करावा, असं भारती सर्वांना म्हणाली