Join us  

"शासनाच्या वतीने वर्षांताईंना दिलेल्या पुरस्कारावर...", मेघा धाडेकडून जान्हवीचा समाचार, म्हणते- "हेच पुरस्कार मिळवण्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 1:00 PM

मराठी मनोरंजन विश्वात बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची जोरजार चर्चा रंगली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : मराठी मनोरंजन विश्वात बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची जोरजार चर्चा रंगली आहे. या पर्वामध्ये पहिल्याच आठवड्यापासून सदस्यांमध्ये दोन गट पडल्याचं चित्र आहे. त्यात या दोन्ही गटांतील सदस्य अगदी छोट्या-छोट्या गोष्टीवरून वाद उकरून काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. या पर्वात जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी हे दोन सदस्य आपल्या वागणुकीमुळे अनेकांच्या निशाण्यावर आले आहेत. 

काल कल्ला टीव्हीमध्ये प्रत्येक सदस्याचा परफॉर्मन्स झाल्यानंतर जान्हवी आणि वर्षा उसगावकर यांच्यामध्ये चांगलीच जुंपली. त्यावेळी जान्हवीने वर्षाताईंचा अभिनय आणि त्यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये संतापाचा सूर उमटत आहे. जान्हवी किल्लेकरच्या अशा वक्तव्यामुळे तिला अनेकांनी ट्रोलही केलं आहे. 

अशातच बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा घाडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याद्वारे अभिनेत्रीने जान्हवीचा खरपुस समाचार घेतला आहे. या पोस्टमध्ये मेघा धाडेने लिहलंय, "महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्कारावर अशा पद्धतीच्या भाषेचा वापर झालेला आहे. त्याबाबत आज मान शरमेने खाली गेली. वर्षा ताई कलर्समराठीने फक्त अपमान होण्याकरिता तुम्हाला या शोमध्ये आणले आहे असे वाटते आहे. हेच पुरस्कार मिळवण्यासाठी कित्येकांची हयात जाते. जेष्ठ कलाकार सचिन पिळगावकर, अशोक सराफ, उषा नाडकर्णी, सयाजी शिंदे, महेश कोठारे, प्रिया बेर्डे यांची व्यक्त केलेली नाराजीमनाला अजून चटका देणारी आहे. प्रशांत दामले आणि मोहन जोशी सर आपल्या डोळ्यातील पाणी बरेच काही सांगून गेले". असं म्हणत अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत रितेश देशमुखलाही टॅग केलंय.  

त्यातच आणखी एक पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणते, "माझ्या लाडक्या बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांनो ही आगाऊ कार्टी जान्हवी नॉमिनेशमध्ये आलीच तर तिला सोडू नका, तिला बाहेरचा रस्ता नक्की दाखवा. ही कळकळीची विनंती आहे". 

पुढे अभिनेत्री म्हणते, "मला अजूनही आठवतंय हिंदी बिग बॉसमध्ये सलमान खान सरांनी प्रियांका जग्गा आणि स्वामीओ ओम यांना त्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे बाहेरचा रस्ता दाखवला होता. आम्हालाही तुमच्याकडून हिच अपेक्षा आहे". असं म्हणतं अभिनेत्रीने कलर्स मराठीसह प्रेक्षकांना टॅग केलं आहे. 

काय म्हणाली जान्हवी?

दरम्यान, गार्डमध्ये सगळे बसले असताना जान्हवी आर्याला उद्देशून निर्लज्य असं म्हणते. त्यावर उत्तर देताना वर्षा उसगावकर म्हणतात, "निर्लज्जम समर्पयामी" तेव्हा त्या दुसऱ्या बाजूला बसेल्या ग्रुपसोबत बसलेल्या असतात. वर्षाताईंचं हे बोलणं ऐकताच जान्हवी राग अनावर होतो आणि ती वर्षाताईंवर बरसली. त्यावर जान्हवी म्हणते, "ताई मी पहिल्या दिवसापासून तुमचा आदर करते. पण, माझ्या नादी लागू नका. पोरं बसतात तिथे तुम्ही केस उडवत येता. तुमची घाणेरडी अॅक्टिंग तुमच्याकडे ठेवा,मला नका दाखवू".  

टॅग्स :मेघा धाडेबिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसोशल मीडियासोशल व्हायरल