Join us  

Avinash Narkar : “मी ऐश्वर्याच्या प्रेमात पडलो आणि...”, अविनाश नारकर यांनी सांगितलं सुखी संसाराचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 2:25 PM

Avinash Narkar Exclusive Interview : मराठीमधील सुप्रसिद्ध जोडप्यांमध्ये ऐश्वर्या व अविनाश यांचं नाव आदराने घेतलं जातं. आता या दोघांच्या लग्नाला २७ वर्षं पूर्ण झाली आहेत...

Avinash Narkar Exclusive Interview : मराठी चित्रपटसृष्टीतील चिरतरुण जोडपं म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय अभिनेते अविनाश नारकर (Avinash Narkar ) आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar  ) नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात.  ऐश्वर्या यांच्याबरोबरच अविनाशही मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत. मराठीमधील सुप्रसिद्ध जोडप्यांमध्ये ऐश्वर्या व अविनाश यांचं नाव आदराने घेतलं जातं. आता या दोघांच्या लग्नाला २७ वर्षं पूर्ण झाली आहेत. दोघंही आनंदाने संसार करत आहेत. या सुखी संसाराचं रहस्य काय तर अलीकडे अविनाश नारकर यांनी याबद्दल सांगितलं

‘३६ गुणी जोडी’ ही मालिका नुकतीच झी मराठीवर सुरू झाली आहे. या मालिकेत अविनाश नारकर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. याच मालिकेच्या निमित्ताने अविनाश यांनी ‘लोकमत फिल्मी’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ऐश्वर्या व त्यांच्या लग्नाबद्दलही त्यांनी सांगितलं.

मी ऐश्वर्याच्या प्रेमात पडलो आणि...३६ गुण कधीच जुळत नसतात. मी ऐश्वर्याच्या प्रेमात पडलो आणि दोघांनी एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. पण आम्ही एकमेकांची पत्रिका वगैर काही पाहिली नाही. इतके गुण जुळतात का तितके गुण जुळतात का, हे आम्ही अजिबात बघितलं नाही. आमची मनं जुळली आणि आम्ही लग्न केलं. गुण जुळणं ही फार लांबची गोष्ट आहे. मनं जुळली की पत्रिकेतले गुण तिथेच आकडे म्हणून राहतात. कुठलीच जोडी जुळत नसते, हेच खरं आहे. कारण प्रत्येक माणसामध्ये प्लस मायनस अर्थात गुण अवगुण असतात. त्यामुळे तडजोड ही तुम्हाला करावीच लागते. कधी तिकडे प्लस असेल तर इकडे मायनस असतं. त्यावेळी त्या प्लसंन आपलं थोडं इकडे द्यायचं असतं. कधी मायनसने मागून घ्यायचं असतं. असं सगळं जमून आलं की, पत्रिकेतले गुण पत्रिकेतचं राहतात आणि संसार खूप छान राहतो, असं अविनाश म्हणाले.

ना आम्ही ऐश्वर्याची पत्रिका मागून घेतली, ना...माझी सख्खी मावशी खूप मोठी ज्योतिषी होती. आज ती या जगात नाही. पण तिने सुद्धा आम्हाला पत्रिका पाहण्याचा आग्रह केला नाही. इतके छान दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत, आता पत्रिका वगैरे पाहण्याची गरज नाही, असं तिने सुद्धा सांगितलं होतं. ना आम्ही ऐश्वर्याची पत्रिका मागून घेतली, ना आम्ही त्यांना दिली. मला वाटतं, एकदा तुमच्या आवडीचं माणूस तुमच्या जवळ आलं की, मग एखादं संकट आलं, मतभेद झाले तर ते तुम्ही एकमेकांच्या साथीने दूर करायचे असतात. सुख हे स्वत:चं स्वत: जपलं की दु:खाकडे आपलं लक्षच जात नाही, असंही ते म्हणाले.

टॅग्स :अविनाश नारकरऐश्वर्या नारकरमराठी अभिनेता