Join us  

बालवीरच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2016 11:43 AM

लहान मुलांची आवडती मालिका बालवीर लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बालवीर या मालिकेचा टिआरपी सुरुवातीपासूनच खूप चांगला होता. या ...

लहान मुलांची आवडती मालिका बालवीर लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बालवीर या मालिकेचा टिआरपी सुरुवातीपासूनच खूप चांगला होता. या मालिकेतील बालवीरची भूमिका साकारणारा देव जोशी तर प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. देवसोबतच या मालिकेत मनिषा ठक्कर, सुदीपा सिंग, यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच करिश्मा तन्ना, शमा सिकंदर, सुगंधा मिश्रा, श्वेता तिवारी, दिपशिखा, रश्मी घोष, श्रुती सेठ, श्वेता कवात्रा यांसारखे छोट्या पडद्यावरचे प्रसिद्ध चेहरेही या मालिकेत झळकले होते. ही मालिका 2012ला सुरू झाली होती. या मालिकेचे आतापर्यंत 1000 भाग पूर्ण झाले आहेत. पण आता ही मालिका बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे. मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण झाले असून 4 नोव्हेंबरला शेवटचा भाग दाखवण्यात येणार आहे.मालिकेच्या शेवटी बालवीर प्रचंडिका या वाईट परीचा वध करणार आहे आणि त्यामुळे परी लोकमधील सगळ्या परी आनंदित होणार आहे. प्रचंडिकाची भूमिका निगार खानने साकारली होती. या शेवटच्या भागाचे चित्रीकरण करण्यास ती खूपच उत्सुक होती. शेवटच्या भागाचे चित्रीकरण करताना टीममधील अनेकजण भावूक झाले होते. सगळ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. तसेच चित्रीकरण संपल्यानंतर सगळ्यांनी मिळून जंगी पार्टी केली. मालिकेचे चित्रीकरण, सहकलाकार यांना आम्ही सगळेच खूप मिस करणार आहोत असे टीममधील प्रत्येकाचे म्हणणे होते. या मालिकेत बालवीरची भूमिका साकारणारा देव सांगतो, "ही बातमी मला काहीच दिवसांपूर्वी कळाली. खरे तर ही बातमी कळल्यावर मला मोठा धक्काच बसला होता. मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण करताना मला खूपच वाईट वाटले. मी बालवीर या मालिकेला, माझ्या व्यक्तिरेखेला खूप मिस करणार आहे. या मालिकेने मला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. त्यामुळे ही मालिका माझ्यासाठी नेहमीच स्पेशल असणार आहे."