Join us  

Bigg Boss Marathi 5 : जान्हवीच्या पतीने सांगितला गेम प्लॅन, म्हणाले- "घरात जाऊन भांडायचं हे तिने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 5:40 PM

जान्हवीचा पती किरण किल्लेकर यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जान्हवीचा गेम प्लॅन, ट्रोलिंग, तिचा स्वभाव या सगळ्यावर भाष्य केलं. 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासूनच अभिनेत्री जान्हवी किल्लेकर चर्चेत आहे. पॅडी कांबळे आणि वर्षा उसगावकर यांच्याशी अपमानास्पद बोलल्याने जान्हवीला ट्रोल करण्यात आलं होतं. रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर जान्हवीची खरडपट्टी काढत तिला एक आठवडा जेलमध्ये राहण्याची शिक्षाही सुनावली. अनेकदा जान्हवीने भांडण करत बिग बॉसचं घरही डोक्यावर घेतलं होतं. आता या सगळ्यावर जान्हवीचा पती किरण किल्लेकर यांनी त्यांची बाजू मांडली आहे. किरण यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जान्हवीचा गेम प्लॅन, ट्रोलिंग, तिचा स्वभाव या सगळ्यावर भाष्य केलं. 

किरण किल्लेकर यांनी जान्हवीचा गेम प्लॅनही सांगितला. ते म्हणाले, "लोक तिच्याबद्दल जे बोलत आहेत. ते मला पटत नाहीये. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी काही कंटेस्टंट आम्हाला माहीत होते. वर्षाताई, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, वैभव चव्हाण, सूरज चव्हाण हे कंटेस्टंट माहीत होते. तिने घरात जाण्याआधी सूरजचे व्हिडिओही पाहिले होते. तो खूप गरीब मुलगा आहे, चांगला आहे, असं ती म्हणाली होती. मी जेव्हा घरात जाईन तेव्हा स्ट्राँग कंटेस्टंट आणि वीक कंटेस्टंट कोण आहेत, हे पहिलं बघेन. तिकडे गेल्यावर मला सगळ्यांशीच भांडायचं आहे. तिकडे चांगलं राहून मला काही मिळणार नाही. आज वैभव जरी माझा चांगला मित्र असला तरी एक दिवस असा येईल, जेव्हा मला त्याच्याविरोधात उभं राहावं लागेल. कारण, हा गेमच असा आहे की तुम्ही भांडा आणि ट्रॉफी घेऊन जा. चांगलं बोलून तुम्हाला ट्रॉफी मिळणार नाही, असं जान्हवी म्हणाली होती". 

पुढे ते म्हणाले, "मी तिला सल्ला दिला होता की तू काहीही कर पण वर्षाताईंसारख्या मोठ्या व्यक्तींना काही बोलू नकोस. तेव्हा ती म्हणाली होती की मी रागाच्या भरात काही बोलून गेले तरी माफी मागेन आणि त्यांना सांगेन की हे तेवढ्यापुरतंच आहे. ती असंही म्हणाली होती की मला जर घरात कोणी वीक कंटेस्टंट वाटलं, तर त्याची मी छेड काढेन. त्याला सांगेन की माझ्याशी भांड आणि फुटेज घे. तिला फुटेजची गरज नाही. ती लोकांना फुटेज देते. सूरजला बोलल्यावर अख्खा महाराष्ट्र पेटेल हे तिला माहीत होतं. पण, त्यात लोकांनी सूरजची चूक होती की नाही हे पाहिलं नाही. पॅडी दादाला ती खूप चुकीचं बोलली. ते मला पटलेलं नाही".  

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार