Join us  

Bigg Boss Marathi Season 5: निक्कीसोबत मैत्री? वैभव चव्हाण म्हणाला, 'तोंडावर सांगतो तिच्याशी माझी कधीच..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 4:30 PM

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: इरिनासोबत ती ज्याप्रकारे वागली...वैभव चव्हाण स्पष्टच बोलला.

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीच्या च्या पाचव्या पर्वात ५० दिवस झाल्यानंतर वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) एलिमिनेट झाला. वैभवला अरबाज २ असंही नाव पडलं होतं. शेवटपर्यंत त्याला त्याचा खेळ सावरता आला नाही आणि अखेर त्याला बाहेर जावं लागलं. घरात निक्कीसोबत (Nikki Tamboli) त्याचं नातं कसं होतं, ती त्याची मैत्रीण आहे का या प्रश्नावर वैभवने सविस्तर उत्तर दिलं आहे. काय म्हणाला वैभव?

घरातून बाहेर आल्यानंतर वैभव चव्हाणने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी तो निक्कीविषयी म्हणाला, " निक्कीची आणि माझी मैत्री कधीच झाली नाही. हे मी तोंडावर सांगतो. आतमध्येही मी हेच बोललो होतो. मान्य आहे मी अरबाजला प्राधान्य दिलं होतं. पण तिच्यासोबत कसलीच मैत्री नव्हती. मी तिला कधीच असं म्हटलं नाही की मी तुला सपोर्ट करेन, तुझी बाजू घेईन. उलट मला जिथे तू चुकीची वाटते तिथे मी तुझी बाजू घेणार नाही हेच मी सांगितलं होतं."

तो पुढे म्हणाला, "तिच्या काही गोष्टी मला अजूनही समजत नाही. ती इरिनाला ज्याप्रकारे बोलली होती तेव्हा मीही तिच्यावर चिडलो होतो. मला त्या गोष्टी पटल्या नव्हत्या. आता बाहेर जाताना म्हणाली की भेट. त्यामुळे मला तिचा मूळ स्वभावच कळलेला नाही. मला तो समजूनही घ्यायचा नाही. जेवढं लांब राहायचा तेवढा प्रयत्न मी केलाय. सगळे म्हणतात की तिचंच ऐकलं जातं. पण तिचं केवळ अरबाज ऐकत होता. मी आणि जान्हवी तिचं ऐकायचो नाही." 

बिग बॉसच्या घरातून आर्या आणि वैभव एकापाठोपाठ बाहेर पडले. त्यामुळे आता खेळ आणखी रंजक वळणावर आला आहे. ५० दिवस झाले आहेत तर आणखी ५० दिवस राहिले आहेत. या आठवड्यात निक्की, अरबाज, वर्षा, जान्हवी आणि सूरज नॉमिनेट झाले आहेत. 

टॅग्स :बिग बॉस मराठीमराठी अभिनेतासोशल मीडिया