'इंडियाज गॉट लेटेंट' हा युट्यूबवरील कॉमेडी शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. या शोमध्ये एका स्पर्धकाने अरुणाचल प्रदेशातील लोकांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे 'इंडियाज गॉट लेटेंट' या शो विरोधात FIR करण्यात आली आहे.
'इंडियाज गॉट लेटेंट' हा लोकप्रिय कॉमेडी शो आहे. कॉमेडियन समय रैना या शोचं सूत्रसंचालन करतो. पण, सध्या एका वेगळ्याच कारणामुळे शो चर्चेत आला आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट'मध्ये अरुणाचल प्रदेशातील जेसी नबाम सहभागी झाली होती. यावेळी तिने अरुणाचल प्रदेशातील लोकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. या शोमध्ये समय रैनाने तिला "तू कधी कुत्र्याचं मांस खाल्लं आहेस का?" असा प्रश्न विचारला. याचं उत्तर देताना ती म्हणाली, "अरुणाचल प्रदेशातील लोक कुत्र्याचं मांस खातात. पण, मी कधी खाल्लेलं नाही. मला याबाबत माहीत आहे कारण माझे मित्रमैत्रिणी खातात. ते कधी कधी त्यांच्या घरातील पाळीव प्राण्यांना मारूनही खातात".
जेसी नबामच्या या वक्तव्याने सगळेच आश्चर्यचकित झाले. बलराज सिंह घई तिला म्हणाला की मला वाटतं तू हे असंच बोलत आहेत. त्यावर तिने नाही हे खरंच आहे असं उत्तर दिलं. याप्रकरणी आता 'इंडियाज गॉट लेटेंटमधील स्पर्धक आणि शोविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. ३१ जानेवारीला ईटानगर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.