Join us

अनिरुद्धपेक्षा दुसरा योग्य राक्षस कोण असेल?; भूमिकेविषयी मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 3:13 PM

Milind gawali: 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्ध ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. ते साकारत असलेली भूमिका निगेटिव्ह असली तरी प्रेक्षकांनी त्यांना भरभरुन प्रेम दिलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी (Milind gawali).  चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांतून मिलिंद यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. सध्या ते 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्ध ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. ते साकारत असलेली भूमिका निगेटिव्ह असली तरी प्रेक्षकांनी त्यांना भरभरुन प्रेम दिलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांच्या प्रत्येक पोस्टला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो. अलिकडेच त्यांनी त्यांच्या भूमिकेविषयी आणि स्टार प्रवाहच्या गणेशोत्सव कार्यक्रमाविषयी एक पोस्ट शेअर केली ही पोस्ट सध्या चर्चेत येत आहे.

"या गणेश उत्सवाच्या कार्यक्रमाच्या आधीची पूर्वतयारी, पूर्वतयारी केल्याशिवाय कुठलंच काम सफल होत नाही. संकल्पनेपासून सुरुवात होते ह्या पूर्वतयारीची, स्टार प्रवाहमधल्या क्रिएटिव्ह माणसाला सुचलेली ही कल्पना, गणेश उत्सवात विघ्नासूरची गोष्ट मांडायची, या विघ्नासूर राक्षसाचा विघ्नेश्वर कसा झाला, ओझरचा विघ्नेश्वर गणपती कसा झाला. स्टार प्रवाहच्या सगळ्या कार्यक्रमांमधून एक राक्षस शोधायचा, मग तो राक्षस शोधणं सुरू झालं. आणि त्यांना तो राक्षस पटकन सापडला. मला फोन आला, मला म्हणाले तुम्ही या रियसल करायला, आणि म्हणाले आपल्याला राक्षसाची रिहर्सल करायची आहे, मी म्हटलं कोण राक्षस?कुठेय राक्षस?, तर ते म्हणाले तुम्हीच आहात की, मी म्हणालो ....मी? , अहो मी नाही ओ राक्षस, ते म्हणाले अहो तुम्हीच आहात..तुम्हीच अनिरुद्र देशमुख आहात ना?तुम्हीच आहात राक्षस", असं मिलिंद म्हणाले. 

पुढे ते म्हणतात, "मग माझ्या लक्षात आलं, कि त्यांना राक्षस शोधणं किती सोपं झालं होतं. अनिरुद्धपेक्षा दुसरा योग्य राक्षस कोण असेल? तर कोणीच नाही. म्हटल आता आपल्याला राक्षस प्ले play करायचा आहे तर प्रॅक्टिस practice करायलाच हवी. वैभव घुगे आणि त्याची टीम असल्यामुळे आपल्याला फार कठीण जाणार नाही, याची आधीच कल्पना होती. अनिल शिंदेने मेहनत घेतली.आणि, माझ्या शंकाकुशंका दूर करून मला पूर्ण राक्षस बनवला.मग काय राक्षस झालोच आहे म्हटल्यानंतर मग राक्षसासारखा वागायला फार मजा आली. विघ्नासुरला देवांनेच निर्माण केलं असल्यामुळे. गणपती बाप्पाने त्याच्या चुका पोटात घालून त्याला आशीर्वाद दिला होता की यापुढे तू विघ्नासूर या नावाने ओळखला जाशील. तर मघ आता जेव्हा गणपती बाप्पा येथील तेव्हा गणपती बाप्पाकडे हाच आशीर्वाद मागायचा की आपल्या आतला जो राक्षस आहे, त्याला दूर करून, जसा विघ्नासूराला विघ्नेश्वर केलंस, तसंच आम्हाला सुद्धा आशीर्वाद दे आणि आम्हा सर्वांचे कल्याण कर. सगळ्या टीमचे खूप खूप आभार.

दरम्यान, मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी अनिरुद्धविषयी भाष्य केलं. तसंच गणेशोत्सवाची तयारी ते कशा पद्धतीने करतायेत हे देखील सांगितलं. 

टॅग्स :मिलिंद गवळीसेलिब्रिटीटेलिव्हिजन