Milind Gawali: स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay karte) ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांच्या यादीत अव्वल स्थावर होती. अगदी काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत अभिनेते मिलींद गवळी (Milind Gawali) यांनी अनिरुद्ध ही भूमिका साकारुन प्रचंड लोकप्रियता मिळवली. अशातच पुन्हा एकदा त्यांनी स्टार प्रवाहवर कमबॅक करत एका लोकप्रिय मालिकेत एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळाल. दरम्यान, अलिकडेच ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत सध्या पार्थ-नंदिनीचा लग्नसोहळा सुरू आहे. या लग्न सोहळ्याला ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळींनी खास उपस्थिती लावली होती. याचा अनुभव त्यांनी सोशल खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना सांगितला आहे.
मिलींद गवळी हे सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असतात. आपल्या आयुष्यातील पडद्यावरील आणि पडद्यामागीलही अनेक गोष्टी ते चाहत्यांबरोबर शेअर करतात. नुकत्याच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने 'लग्नानंतर होईलच प्रेम' काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी त्यांचा अनुभवही लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, "लग्नानंतर होईलच प्रेम" मध्ये यशवंतराव भोसले या भूमिकेचे शूटिंग संपवून घरी आलो, सलग पाच-सहा दिवस मिरा रोडच्या एका भव्य दिव्य मोनार्क स्टुडिओमध्ये या मालिकेचं शूटिंग मी केलं, अचानक एका वेगळा विश्वात गेल्यासारखं वाटलं, गेली पाच वर्ष "आई कुठे काय करते" या स्टार प्रवाह वरच्या मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख ही भूमिका जगत होतो, आणि ती भूमिका अंगवळणी पडली होती, गेल्या पाच वर्षांमध्ये एक टाटा टी ची ऍड आणि काही इव्हेंट सोडले तर मी सातत्याने अनिरुद्धच साकारत होतो, काही महिन्यापूर्वीच मालिका संपली, स्वतःसाठी घरच्यांसाठी मित्रमंडळी नातेवाईकांसाठी वेळ देत होतो, आणि अचानक शशांक सोळंकी जो मराठी मालिका विश्वातला मोठा निर्माता आहे, जो माझ्या कॉलेजमधला वर्गमित्र पण आहे, त्याने मला त्याच्या लोकप्रिय मालिकेमध्ये म्हणजेच "लग्नानंतर होईलच प्रेम" मध्ये पाहुणा कलाकार म्हणून एक महत्त्वपूर्ण भूमिका करण्यासाठी विचारलं, स्टार प्रवाह ने पण त्या गोष्टीला दुजोरा दिला, आणि मी उत्साहामध्ये या मालिकेच्या सेटवर पोहोचलो, माजी कल्याण मंत्री यशवंतराव भोसले ही भूमिका मला साकारायला मिळाली, सलग सहा दिवस या यशवंतराव भोसले च्या भूमिकेमध्ये होतो, आणि आत्ताच ती भूमिका संपवून घरी आलो, आणि मला फारच भारी वाटत आहे."
पुढे अभिनेते म्हणाले, एका छोट्याशा कालावधीमध्ये, मनाला समाधान देणारी अशी भूमिका मला साकारायला मिळाल्याचा एक वेगळा आनंद होत आहे, स्टार प्रवाह वरच्या "आई कुठे काय करते" या अतिशय गाजलेल्या मालिकेनंतर मला पुन्हा स्टार प्रवाहवर काम करायला मिळालं याचा पण आनंद वेगळा आहे, आपण ज्यांच्या बरोबर काम करतो, ते काम पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला पुन्हा काम करण्यासाठी बोलावणं येतं, त्या गोष्टीचं समाधान वेगळंच असतं, मालिका निर्माता शशांक सोळंकी जो माझा वर्गमित्र आहे, एकाच बाकावर आम्ही कॉलेजमध्ये बसायचो, दोघांना chess खेळाची अतिशय आवड, कॉलेजच्या लायब्ररीमध्ये आम्ही दोघं चेस खेळत असू, एकमेकांच्या घरी येणं जाणं , वर्गमित्र निर्माता आणि त्याच्या मालिकेमध्ये आपण काम करतो आहे, या गोष्टीचा ही आनंद आणि समाधान हे मनाला सुखावणारं आहे."
"लग्नानंतर होईलच प्रेम" या मालिकेत चे कलाकार आणि तंत्रज्ञान माझ्यासाठी तसे अनोळखी होते, काही मोजके कलाकार सोडले तर पहिल्यांदा काम करत होतो सगळ्यांबरोबर, फक्त अविनाश नारकर, जानवी ताई पणशीकर, यांच्याबरोबरच आधी मी काम केलं होतं. पण सेटवर गेल्यानंतर मला मी त्यांच्या या कुटुंबात नवीन आहे किंवा एक पाहुणा आहे असं अजिबात वाटलं नाही. दिग्दर्शक भरत गायकवाड यांच्या बरोबर काम करून समाधान वाटलं. खूपच मजा आली." अशा आशयाची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.