दररोज सायबर क्राइमच्या नव्या घटना समोर येत आहेत. 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडेदेखील सायबर क्राइमचा शिकार झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. सागर कारंडेला चोरट्यांनी लाखोंचा गंडा घातल्याचं यात म्हटलं गेलं होतं. इन्स्टाग्राम पोस्ट लाइक करून १५० रुपये मिळवण्याच्या नादात सागरने तब्बल ६१.८३ लाख रुपये गमावल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र तो सागर कारंडे मी नसल्याचं अभिनेत्याने स्पष्ट केलं आहे.
या संपूर्ण प्रकरणानंतर सागरने झी २४ तास या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. यामध्ये त्याने ही खोटी बातमी असून मी तो सागर कारंडे नव्हे, असं म्हटलं आहे. "ह्या खोट्या बातम्या आहेत. ६१ लाख माझ्याकडे कसे असतील? मी या बाकीच्या गोष्टी कशाला केल्या असता. मी नाटक प्रोड्युस केलं असतं. मुंबईला गेल्यानंतर या सगळ्याचा तपास करणार आहे. आणि त्याबरोबरच अब्रु नुकसानीचा दावादेखील करणार आहे", असं सागरने सांगितलं आहे. या बातमीमुळे सागर कारंडेला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नेमकं काय घडलं?
सागर कारंडे नामक व्यक्तीला फेब्रुवारी महिन्यात इन्स्टाग्राम पोस्ट लाइक करा आणि पैसे कमवा असा आशयाचा मेसेज व्हॉट्स अॅपवर आला होता. एक इन्स्टा पोस्ट लाइक करण्याचे त्याला १५० रुपये मिळणार होते. घरबसल्या काम असल्याने या मोहाला तो बळी पडला आणि ६१ लाख रुपये गमावले. एका अनोळखी व्हॉट्सअॅप वरुन एका महिलेने सागरला संपर्क केला होता. टेलिग्राम आणि इतर समाजमाध्यमांवर पाठवण्यात येणाऱ्या इन्स्टाग्राम लिंक लाइक करायच्या आहेत, असं त्याला सांगण्यात आलं होतं. या कामासाठी सागरला सुरुवातीला काही पैसे भरावे लागणार होते. ते पैसे कुठेही वापरले जाणार नाहीत, असं त्याला सांगण्यात आलं होतं. यावर विश्वास ठेवून सागरने सुरुवातीला २७ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. सुरुवातीला सागरला ११ हजारांचे कामही देण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
काही दिवसांनंतर सागरने वॉलेटमधील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वॉलेटमधील पैसे काढू नये, टास्क पूर्ण झाल्यावर ते मिळतील, असंही त्याला सांगितलं गेलं होतं. त्याबरोबरच १०० टक्के टास्क पूर्ण करण्यासाठी आणखी काही रक्कम भरावी लागेल. असे म्हणत सागरला सायबर गुन्हेगारांनी आणखी १९ लाख रुपये आणि त्यावर ३०टक्के कर भरण्यास भाग पडलं. अशा प्रकारे त्याच्याकडून ६१ लाख रुपये उकळण्यात आले. एवढे पैसे गुंतवल्यानंतरही कर चुकीच्या खात्यात जमा झाल्याचं सांगत सागरला आणखी पैसे गुंतवण्यास सांगण्यात आलं. पैसे मिळत नसल्याने आपल्याला फसवलं गेल्याचं सागर कारंडेच्या लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांत धाव घेतली.