Utkarsh Shinde: लोकप्रिय मराठी गायक, संगीतकार तसेच अभिनेता उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) हा कायमच चर्चेत असलेला पाहायला मिळतो. उत्कर्षने आजवर अनेक सुपरहिट गाणी गायली. त्याचबरोबर बिग बॉस मराठी-३ च्या पर्वात सहभागी होऊन त्याने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली होती. उत्कर्षने आजवर आपल्या गाण्यामुळे, अभिनयामुळे व त्याच्या खास लेखनशैलीने सर्वांच्याच मनात स्थान निर्माण केलं आहे. आता अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमुळे तो चर्चेत आला आहे.
उत्कर्ष शिंदेने नुकतीच एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्या पॉडकास्टमध्ये त्याला अनेक रिॲलिटी शोमध्ये जो गायक जिंकतो किंवा दिसतो तो पुन्हा प्लेबॅक सिंगिंग करताना दिसत नाहीत, त्यावर उत्कर्षने खूप सुंदर मत व्यक्त केलंय. त्यावेळी उत्कर्ष म्हणाला, "मला असं वाटतं की यामध्ये संघर्ष असतो. बऱ्याच जणांना असं वाटत असावं की अरे, मी हा रिअॅलिटी शो मी जिंकलो किंवा दिसलो तर आपल्यासाठी पुढील मार्ग खूप सोपा आहे, त्यामुळे त्यांची संघर्ष करण्याची जिद्द कुठेतरी कमी होत असेल. त्यांना वाटत असेल की आता मला प्रसिद्धी मिळाली, आता मला स्टारडम मिळालं, अशा अविर्भावामध्ये बरेच लोक खूश होतात."
जोपर्यंत तुम्ही स्वत:ला नेहमी सिद्ध कराल, तोपर्यंत प्रसिद्ध व्हाल
त्यानंतर पुढे उत्कर्ष म्हणाला, परंतु, शिंदे कुटुंब म्हणून आम्ही पिढ्यानपिढ्या या गोष्टीवर विश्वास ठेवतो की जोपर्यंत तुम्ही स्वत:ला नेहमी सिद्ध कराल, तोपर्यंत प्रसिद्ध व्हाल. मला वाटतं हे सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे. आपण कुठपर्यंत पोहोचलोय किंवा आपल्याला आज काय मिळालंय यापेक्षा आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे त्याची तयारी कधी सोडू नये. आपण कधी काही पुरस्कार जिंकलो किंवा नाही जिंकलो तर काही फरक पडत नाही. पण, आपल्याला खूप काही जिंकायचं आहे; यासाठी रोज नव्याने तयारी केली तरच आपल्याला जे हवं ते आपण गाठू शकतो.", असं परखड मत उत्कर्ष शिंदेने मांडलं.