Join us  

कौटुंबिक गुंतागुंतीच्या नात्यावर आधारीत मालिका 'मेहंदी वाला घर', शहजाद शेख दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 7:53 PM

Mehndi wala Ghar Serial : 'मेहंदी वाला घर' या मालिकेत उज्जैनमधल्या अग्रवाल कुटुंबाचा परिचय प्रेक्षकांना करून देण्यात येणार आहे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'मेहंदी वाला घर' (Mehndi wala Ghar Serial) या मालिकेत उज्जैनमधल्या अग्रवाल कुटुंबाचा परिचय प्रेक्षकांना करून देण्यात येणार आहे. या कुटुंबातील गुंतागुंतीची नाती दाखवताना ही मालिका प्रेक्षकांच्या मनात ही धास्ती देखील निर्माण करेल की, प्रतिकूल परिस्थितीत सगळे अग्रवाल कुटुंबीय एकजूट राहतील ना? या कुटुंबाच्या अंगणाची शोभा वाढवणाऱ्या अनेक दशके जुन्या एका मेंदीच्या झाडाकडून ही कथा प्रेक्षकांना ऐकायला  मिळेल. ही मालिका आज २३ जानेवारीपासून दर रात्री साडेनऊ वाजता भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेता शहजाद शेख (Shehzaad Shaikh) राहुल अग्रवाल ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. आपल्या भूमिकेविषयी बोलताना शहजाद म्हणाला, “माझा या गोष्टीवर ठाम विश्वास आहे की, जे कुटुंब एकत्र जेवते, एकत्र प्रार्थना करते ते गुण्या-गोविंदाने नांदते. काहीशी अशीच भावना व्यक्त करणारी आमची मालिका 'मेहंदी वाला घर' आणि हे अग्रवाल कुटुंब देशभरातील प्रेक्षकांना नक्की आवडेल. मी जेव्हा ही गोष्ट ऐकली आणि त्यातल्या पात्रांशी माझा परिचय झाला, तेव्हा मला वाटले की जणू माझ्याच कुटुंबाची गोष्ट मला सांगण्यात येत आहे. त्यातली कडक पण प्रेमळ आजी असो, प्रेमळ काका असो किंवा मस्तीखोर चुलत भावंडे असो. ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला तुमच्या विस्तारित कुटुंबाचीच आठवण करून देईल. मी साकारत असलेला राहुल प्रेमळ, गंमतीशीर, बडबड्या स्वभावाचा माणूस आहे. कुटुंबाच्या बाबतीत त्याची काही ठाम मतं आहेत. त्यामुळे ही एक आव्हानात्मक पण सार्थकता देणारी भूमिका आहे. मला ‘हम साथ साथ हैं’, ‘बागबान’ आणि ‘हम आपके हैं कौन’ यांसारखे चित्रपट फारच आवडतात आणि या मालिकेसाठी शूटिंग करताना मला अशा जगाचा भाग असल्यासारखे वाटते, ज्यात कौटुंबिक मूल्ये आणि नाती केंद्रस्थानी असतात.”

 शूटिंगचा अनुभव सांगताना शहजाद म्हणतो, “मी पहिल्यांदाच या सुंदर शहरात आलो आहे. आणि मला मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. माझ्या सहकारी कलाकारांसोबत उज्जैन शहर फिरताना खूप मजा आली. शिवाय इथे आम्ही दाल-बाफला, जिलबी, आलू बडा आणि इतर अनेक खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. आम्हाला मोकळा वेळ मिळाला की आम्ही या शहराच्या अरुंद गल्ल्यांमधून हिंडायचो. यातून आम्हाला या शहराचे सौंदर्य आणि साधेपणा जाणवला. एका मेळ्यात शूटिंग करण्याचा अनुभव तर फारच छान होता. आम्हाला आमचे बालपण आठवले.”