Join us

"कोणाची हिंमत नाही झाली पण..."; मालिकेच्या शूटींगदरम्यान मिलिंद गवळींना झाली 'ही' महत्वाची जाणीव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 1:48 PM

आई कुठे काय करते मधील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळींनी मालिकेच्या शूटींगदरम्यान त्यांना आलेला अनुभव सांगितलाय (aai kuthe kay karte)

'आई कुठे काय करते' मालिकेत सध्या अनिरुद्ध - संजना, अरुंधती - मिहिर हे चौघांनी कूकींग स्पर्धेत भाग घेतलाय. या चौघांपैकी कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळींनी शूटींगचा खास व्हिडीओ पोस्ट करुन लिहिलंय की, "कोणाची हिंमत झाली नाही पण कांद्याने रडवलं"काल शूटिंग मध्ये मला कांदे कापायला लागले, डोळ्यातून पाणी यायला लागलं, जी sceneची गरज होती. मी म्हणजे अनिरुद्ध पहिल्यांदा कांदा कापतो आणि, त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागतं, त्याला काही दिसत नाही आणि तो वैतागतो, आणि म्हणतो "काय कटकट आहे ही" "काय फालतुगिरी आहे कशाला आलोय मी इथे?" आणि नंतर त्याला जाणीव होते की स्वयंपाक करणं काय साधी गोष्ट नाहीय."

मिलिंद गवळी पुढे लिहितात, "पूर्वी त्याला असं वाटायचं की स्वयंपाक करणाऱ्या बायका काय फार मोठं काम करत नाहीत, स्वयंपाक करणं म्हणजे काय रॉकेट सायन्स नाहीये. कोणीही करू शकतं, अशी त्याची धारणा होती पण प्रत्यक्षात त्याला जेव्हा स्वयंपाक करायला लागला त्यावेळेला त्याला ही जाणीव झाली की हे काय फार सोपं नाहीये , आता प्रत्यक्ष आयुष्यामध्ये किती लोकांना ही जाणीव असते?, की जी माऊली स्वयंपाक करते (आजकालच्या जमान्यात फक्त माउल्या स्वयंपाक करत नाही तर बरेचसे पुरुष ही स्वयंपाक करतात) पण खरंच किती लोकांना ती जाणीव आहे की जो स्वयंपाक करतो, त्याचे किती कष्ट असतात ते अन्न तयार करण्यामध्ये."

मिलिंद गवळी पुढे लिहितात, "पण हल्ली अनेकांना मी बघतो की खाताना तोंडं वाकडी करतात, चवच आली नाही असं म्हणतात किंवा आपण काहीतरी बाहेरून मागू या, घरी बनवलेलं बेचव आहे आणि हल्ली तर काय स्विगी, झोमॅटो अशा असंख्य ॲप्स आले आहेतच, ज्याच्याने आपण पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपल्याला हवं ते मागवू शकतो आणि आजकालची मुलं सर्रास बाहेरून अन्न मागवतात, दीडशे दोनशे अडीचशे मध्ये तुम्हाला ते तुमच्या घरपोच मिळतं, पण त्या अन्नाला घरच्या अन्नाची सर येईल का? किंवा ते तितकं हायजिनिक असतं का? कुठल्या प्रकारचं तेल वापरलं असत? Palm oil ? किती स्वच्छता पाळली असेल? घेऊन येणारा कशा पद्धतीने घेऊन येत असेल? हे सगळं रामभरोसेचं आहे."

मिलिंद गवळी शेवटी लिहितात, "जसजसं आपण ऍडव्हान्स होत जातो तसतसे आपण परावलंबी होत जातोय किंवा सोप्प करायचं प्रयत्न करतो आणि आपल्या तब्येतीची वाट लावून घेतोय, आपल्या शरीराची वाट लावून घेतोय असं नाहीये की मी कधी बाहेरच अन्न खात नाही पण give an a choice जर एखाद्या माऊलीने तीच्या घरात बनवलेलं अन्न असेल आणि बाहेरचं जनरल अन्न असेल, तर मी घरचं केलेलेच अन्न खातो, मग ती माऊली कोणीही असो. "आज मला कोणी नाही पण कांद्याने मात्र मला रडवलं" पण त्या अश्रूंबरोबर माझे पुन्हा एकदा डोळे उघडले प्रत्येक अन्न शिजवणाऱ्या व्यक्तीचे मनापासून आभार मानायला हवेत,त्यांच्या कष्टाची कदर करायला हवी,थोडं कमी जास्त झालं असेल तरीसुद्धा मनापासून त्यांचं ग्रहण केलं तर आपली कायम तब्येत चांगली राहील."

टॅग्स :मिलिंद गवळीआई कुठे काय करते मालिकाकिचन टिप्स