Join us  

"आई गेल्याचं दुःख अन् त्यात कॉमेडी सीन..."; मिलिंद गवळींनी सांगितली भावुक आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 4:37 PM

मिलिंद गवळी सोशल मीडियावर सांगितलेली आठवण वाचून कलाकार म्हणून अभिनेत्याला कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं ते सांगितलं आहे (milind gawali

मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर एक भावुक किस्सा सांगितला आहे. आईचं निधन झाल्यावर पुढील तीन दिवसात मिलिंद गवळी कॉमेडी सीन करण्यासाठी शूटींग करायला गेले. त्यावेळी त्यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितला आहे. मिलिंद गवळी लिहितात, "मोस्ट वॉन्टेड" हा चित्रपट कायम माझ्या स्मरणात राहतो तो एका कारणासाठी, माझी आई गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी या सिनेमाचं शूटिंग करायला फिल्मसिटी ला गेलो होतो, कारण आई असती तर शूटिंग सोडून घरात दुःख करत बसलो आहे हे तिला अजिबात आवडलं नसतं.नेमकं त्यादिवशी माझा अशोक सराफ यांच्याबरोबर एक कॉमेडी सीन होता, मनात प्रचंड आई गेल्याचे दुःख आणि आपण एक कॉमेडी सीन करतोय, ते मनावरचं ओझं, आणि ते feeling मी आजही विसरू शकत नाही."

मिलिंद गवळी पुढे लिहितात, "हा मोस्ट वॉन्टेड चित्रपट राजन प्रभू यांनी लेखन आणि दिग्दर्शन केला होता त्यात राजन कामही करत होता, राजन बरोबर याआदी "घात प्रतिघात" या चित्रपटात काम केलं असल्यामुळे त्याच्याशी छान मैत्री झाली होती. आपल्या मित्राचं नुकसान होऊ नये म्हणून ३ मार्चला आई गेल्यानंतर मी ५ मार्च २००९ ला शूटिंगसाठी हो म्हटलं होतं.हा चित्रपट खूपच इंटरेस्टिंग होता, सात गुन्हेगार जेलमध्ये भेटतात, बाहेर पडल्यानंतर ते त्यांची टोळी तयार करतात, आणि मग त्यांच्या प्रवासामध्ये त्यां च्यामध्ये कसा बदल होत जातो आणि ते चांगले नागरिक होण्याचा प्रयत्न करतात. या चित्रपटामध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून सुबल सरकारांना घ्यावं असा मी राजन प्रभूंना आग्रह केला आणि तो त्यांनी मान्य ही केला, त्यामुळे या चित्रपटांमध्ये सुफल सरकार यांचं नृत्य दिग्दर्शन होतं आणि ते फार सुंदर पद्धतीने त्यांनी केलं, या चित्रपटामध्ये विजय चव्हाण हे देखील होते, त्यांचे शूटिंगचे दिवस कमी जरी असले तरी त्यांनी या चित्रपटांमध्ये खूप धमाल उडून दिली होती, चित्रपटात अशोक सराफ, दीपक शिर्के हे सुद्धा मुख्य भूमितीत होते."

मिलिंद गवळी पुढे लिहितात, "एक कर्मणुकीचा एंटरटेनिंग सिनेमा किंवा मसाला चित्रपट म्हणाला काय हरकत नाही, ज्याच्यात धमाल गाणी नाच मारामाऱ्या बंदुकी गोळ्या, विनोद, इमोशन्स डायलॉग बाजी सगळंच भरभरून होतं, या चित्रपटात काम करताना खरं मजा येत होती, मराठी चित्रपटाचा दुर्दैव असं की त्याला वितरक नाहीयेत आणि जे वितरक आहेत ते मराठी चित्रपटांच्या दृष्टीने कमकुवत आहेत. लोकांपर्यंत चित्रपट पोचवला जात नाही, त्यांची यंत्रणाच कमी पडते, आणि लोकांपर्यंत चित्रपट पोहोचत नसल्यामुळे निर्मात्याला त्यांनी गुंतवलेले पैसे परत मिळत नाहीत, वितरकाला त्याची फी मिळते, एक्झिबिटरला त्याची फी मिळते, थेटरला आपापली भाडी मिळतात, उरतो कोन तर फक्त निर्माता, ज्याने सगळ्यांचे पैसे दिलेले असतात, पण शेवटी त्याच्या वाटेला त्यांनी टाकलेला पैसा परत येत नाही, हा एक संशोधनाचा विषय आहे."

टॅग्स :मिलिंद गवळीआई कुठे काय करते मालिका