Join us  

'इतक्या बेभरवशाच्या वेळेत...', मुंबई AC Local च्या खोळंब्याने अभिनेत्रीचा संताप, अनुभव सांगत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 12:38 PM

एसी लोकल वेळेवर नसतात, असा प्रवाशांचा सूर अधिक तीव्र होताना दिसत आहे. यावरच मराठी अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केली आहे. 

मुंबईची लोकल ही प्रवाशांचा जिव्हाळ्याचा विषय. दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. आपापली कार्यालये गाठण्यासाठी वेगवान आणि किफायतशीर प्रवास म्हणून मुंबई लोकलकडे ओढा प्रचंड आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून अनेक उपाययोजना, सेवा, सुविधा दिल्या जातात. वातानुकूलित लोकल सेवा सुरू करून रेल्वेने प्रवाशांचा धकाधकीचा प्रवास काहीसा सुलभ केला आहे. मात्र, याच एसी लोकलला वेळापत्रकाचे ग्रहण लागलेले सध्या पाहायला मिळत आहे. एसी लोकल वेळेवर नसतात, असा प्रवाशांचा सूर अधिक तीव्र होताना दिसत आहे. यावरच मराठी अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केली आहे. 

अभिनेत्री अक्षता आपटेने तिचा हा अनुभव शेअर केला आहे. तिनं लिहलं, 'मध्य रेल्वेवर AC trains एकतर वेळेवर तरी याव्यात, नाहीतर ट्रेनमध्ये चढल्यावर TC ने तिकीट नसेल तर… दंड न घेता प्रवाशांकडे असलेलं साधं किंवा First Class चं तिकीट तिथल्या तिथे upgrade करून द्यावं.AC train पकडण्याच्या तयारीत AC चं तिकीट काढलं तर ट्रेन येता येत नाही, वाट बघण्यात वेळ वाया जातो आणि शेवटी साधीच गाडी पकडून यावं लागतं, AC ट्रेनच्या तिकिटाचे पैसे वाया जातात आणि ‘जाऊदे आता AC train कधीच निघून गेली असेल’ असं म्हणून साधं किंवा even First Class च तिकीट असेल तर नेमकी (भयंकर late असलेली) AC train तेव्हा येणार'.

पुढे तिनं लिहलं, 'घाईघाईत तिकीट विंडोवर जाऊन तिकीट काढून येण्याइतपत वेळ नसतो, आणि प्रत्येक स्थानकावर ATVM मशीन सुद्धा नसतं. अशावेळी त्या ट्रेनमध्ये चढून TC फक्त 15/- चा फरक असला तरीही दंड आकारणार. म्हणजे तेही पैसे आपली काही चूक नसताना जावेत.असा गोंधळ माझ्या बाबतीत अनेकदा झालाय. म्हणजे मी First Class चं तिकीट असताना शिस्तीत दंड सुद्धा भरलाय आणि अचानक indicator वर unexpectedly AC train दिसल्यावर दादरला ८ नं. वरुन धावत वर जाऊन main window वर जाऊन तिकीट काढून येईपर्यंत train गेलीए. या दोन्ही cases मध्ये AC train भयंकर उशिरा होती आणि मला खरंच कुठेतरी पोहोचण्याची घाई होती. पैसे वायाच दोन्हीकडे. यात चूक कोणाची ?', असा सवालही अक्षताने विचारला आहे. 

पुढे तिने म्हटलं की, 'वाहतूक कोंडी कमी व्हावी, प्रवासाचा वेळ वाचावा आणि थोडा आरामदायी प्रवास व्हावा म्हणून चालू केल्या आहेत ना AC ट्रेन्स? त्यासाठी प्रामाणिकपणे तिकीटाचे एवढे पैसे खर्च केल्यावर इतक्या rare trains इतक्या बेभरवशाच्या वेळेत आल्या तर कसं चालेल?? उलट त्या तर top priority असल्या पाहिजेत ना… काय वाटतं? आणि M-indicator सुद्धा अशावेळी नेमकं कसं माती खातं के कळत नाही!', या शब्दात अभिनेत्रीने आपल्या लोकल प्रवासाची व्यथा मांडली आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीमुंबईमुंबई लोकल