Join us  

३ महिन्यांतच लोकप्रिय मालिकेने गुंडाळला गाशा, अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणतो- "खूप वाईट वाटतंय..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 11:47 AM

...अन् अचानक मालिकेचा प्रवास संपतो! ३ महिन्यांतच मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्याची भावुक पोस्ट

काही महिन्यांपूर्वीच सन मराठी या वाहिनीवर 'भूमिकन्या' ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेतून मातीतल्या लेकीची गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली होती. अभिनेत्री श्रुती मराठेने या मालिकेची निर्मिती केली होती. तर श्रुतीचा पती आणि अभिनेता गौरव घाटनेकर या मालिकेत मुख्य भूमिकेत होता. पण, अवघ्या तीनच महिन्यांत या मालिकेला निरोप घ्यावा लागला आहे. मालिका संपल्यानंतर या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

जून महिन्यात 'भूमिकन्या' मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत होती. मात्र काही कारणांमुळे या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. शनिवारी २१ सप्टेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला आहे. 'भूमिकन्या' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेता मिलिंद अधिकारी यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

मिलिंद अधिकारी यांची भावुक पोस्ट

दिर्घकाळ मालिका चालण्याच्या काळात एखादी मालिका मोजक्याच भागात संपली तर… तर लागणारी हुरहुर अत्यंत वेदनादायी असते. कारण मालिकेच्या माध्यमातून बरंच काही दाखवायचं ठरलेलं असतं आणि सगळंच राहून गेलेलं असतं. आत्ता कुठे प्रवास सुरू झालेला असतो, कलाकार तंत्रज्ञांमधे एक नातं निर्माण व्हायला सुरूवात होत असते, काही कलाकारांची ती पहिलीच मालिका असते, त्यात प्रेक्षकांचे येणारे संमिश्र प्रतिसाद हुरूप वाढवत असतात, बळ देत असतात आणि अचानक मालिकेचा प्रवास थांबतो…!

 

अगदी असंच घडलंय…!!

नव्यानेच सुरू झालेली ‘भूमिकन्या’ ही आमची मालिका अवघ्या ९३ भागांत आज प्रेक्षकांचा निरोप घेते आहे...अगदी कायमचा!!!

आनंद या गोष्टीचा आहे की या मालिकेलाही प्रेक्षकांचा भक्कम प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने थोड्याफार प्रमाणात निसर्गाशी एकरूप होता आलं ही सुद्धा जमेचीच बाजू... फक्त आमच्याकडून ठरवलेलं असूनही वेळेअभावी प्रेक्षकांना वेगळं काहीतरी द्यायचं मात्र राहूनच गेलं याचं तीव्र दुःख आहे.

व्यक्तीशः माझा या मालिकेसाठी ॲाडिशन देण्यापासून सुरू झालेला भूमिकेचा मानसिक प्रवास अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन थांबवावा लागला याचं जरा जास्त वाईट वाटतंय. तशा याआधीही मला नकारात्मक भूमिका साकारायला मिळाल्या पण ‘हैबतराव घोरपडे’ एंट्रीपासूनच त्या सगळ्यांच्यावर होता… हैबत.. you will be missed forever!

ही भूमिका माझ्या वाट्याला आली यासाठी @sonymarathi ब्लॅक कॅाफी प्रॅाडक्शनचे निर्माते @shrumarathe @gauravghatnekar वाचनापासून ह्या भूमिकेची खोली समजावून सांगणाऱ्या दिग्दर्शक @avdhut_purohit सरांचे, तसंच सहाय्यक दिग्दर्शक @vikram_d_patil @joshiganesh23 @jadhavpayal2000 @ushank_mhatre अलिकडेच आलेले @shridharpatil.22 सर, सहाय्यक दिग्दर्शक @mangesh7069 क्रिएटीव्ह टीमचे @salvi_rohit1405 @prii.angel_n_devil @harshad_301996 @_chaitralee.11_ @deshpande1304 सर्व सहकलाकारांचे, Dop @sheakhar_11 पडद्यामागचे @vipinpandey @suhaschaudhari इतरही सर्व तंत्रज्ञांचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांचे मनापासून आभार.

'भूमिकन्या' मालिकेत मिलिंद अधिकारी हैबतराव घोरपडे हे खलनायकाचं पात्र साकारत होते. त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'लग्नाची बेडी' या मालिकेतही ते महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेतासेलिब्रिटी