Join us  

'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करणार का? वर्षा उसगांवकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 1:40 PM

मालिका संपल्यानंतर वर्षा उसगांवकर बिग बॉसमध्ये जाणार? या चर्चांवर त्यांनी स्वत: उत्तर दिलं आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' मालिकेत दिसत होत्या. ही मालिका प्रचंड गाजली. मात्र जेव्हा मालिकेत लीप दाखवला तेव्हा मात्र याचा टीआरपी घसरला. काही दिवसांपूर्वीच वर्षा उसगांवकरांनी  मालिकेचा निरोप घेतला. तर आता त्या बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर अखेर त्यांनी उत्तर दिलं आहे.

येत्या 28 जुलैपासून कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस मराठी 5 ची सुरुवात होत आहे. यंदा रितेश देशमुख होस्टची धुरा सांभाळणार आहे. तसंच यावेळी कोणकोणते स्पर्धक घरात प्रवेश करणार याची चर्चा रंगली आहे. अद्याप अधिकृत नावं समोर आलेली नाहीत मात्र काही नावांची चर्चा आहे. त्यातच वर्षा उसगांवकर या बिग बॉसमध्ये जाणार असं बोललं जात होतं. यावर 'मुंबई टाईम्स'शी संवाद साधताना त्या म्हणाल्या, "मी बिग बॉसच्या घरात जाणार नाही. ही कल्पना नक्की कोणाच्या डोक्यात आली माहित नाही. पण ही अफवा आहे यावर विश्वास ठेवू नका."

वर्षा उसगांवकर 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' मालिकेत नंदिनी पाटील या व्यक्तिरेखेत दिसत होत्या. मालिका सोडण्याविषयी त्या म्हणाल्या, "मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेला पुढे वाव नाही हे मला आणि निर्मात्यांना माहित होतं. त्यामुळे सामंजस्याने हा निर्णय घेतला गेला. मालिकेतील सुरु असलेल्या कथानकात नायक-नायिका आणि दोन खलनायिका यांना वाव होता. त्यामुळे माझ्या व्यक्तिरेखेचं पुढे भवितव्य नव्हतं."

मालिकेतून बाहेर पडल्यानंतर पुढे काय करणार यावरही त्यांनी मुलाखतीत उत्तर दिलं. त्या लवकरच दोन वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत. नंतर सिनेमांमध्येही काम करण्याचा त्यांचा विचार आहे. 

टॅग्स :वर्षा उसगांवकरबिग बॉसटिव्ही कलाकारमराठी अभिनेता