Join us

'इंद्रायणी' मालिकेत आनंदीच्या विळख्यातून इंदूला बाहेर काढणार विठुराया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:06 IST

Indrayani Serial : 'इंद्रायणी' मालिकेत बऱ्याच घटना घडल्या. गावावरचे भूताचे संकट इंदू आणि फंट्या गँग मिळून अत्यंत नाट्यमय पद्धतीने सर्वांसमोर आणले.

कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' (Indrayani Serial) मालिकेत बऱ्याच घटना घडल्या. गावावरचे भूताचे संकट इंदू आणि फंट्या गँग मिळून अत्यंत नाट्यमय पद्धतीने सर्वांसमोर आणले. गावावर आलेले अंधश्रद्धेचे मोठे वादळ दूर केल्याने सर्वत्र इंदूचे भरभरून कौतुक झाले. इंदूने सत्याची साथ कधी सोडली नाही आणि गावावरचे जे संकट होते ते दूर केले ज्यामुळे व्यंकू महाराज आणि गावकऱ्यांच्या आग्रहाखातर इंदूचा बाल कीर्तनकार बनण्याचा प्रवास सुरु झाला. ज्यामध्ये व्यंकू महाराजांच्या उपस्थित इंदूने पहिल्यांदाच एकटी विशेष कीर्तन करताना दिसून आली. हे सगळं घडत असतानाच आनंदीबाईंनी त्यांची वेगळी खेळी रचायला सुरुवात केली. 

इंदूचा आजवर दु:स्वास करणारी, विरोध करणारी आनंदीबाई अचानक इंदूच्या बाजूने उभी राहते हे जरा खटकणारेच वाटले.  इंदूला कीर्तनकार बनविण्यामागचा आनंदीबाईंचा हेतू काही वेगळाच आहे, हे व्यंकू महाराजांना कळेल? आनंदीबाईंचा खरा चेहरा इंदूच्या समोर येईल? आनंदीबाईंच्या या अचानक झालेल्या बदला मागचे नक्की कारण त्यांना कळेल? स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आणि पैश्याच्या हव्यासापोटी आनंदीबाई इंदूचा वापर करत आहेत. आनंदीच्या विळख्यातून इंदूला विठुराया कसा बाहेर काढणार... तिचा पाठीराखा तिला कसा वाचवणार? हे बघणे रंजक असणार आहे. पुढे काय होणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

इंद्रायणी बरोबर आनंदीबाई आता चांगलं वागणार

याबद्दल बोलताना आनंदीबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनिता दाते म्हणाली, "मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. येत्या ट्रॅकमुळे मालिकेला एक वेगळीच कलाटणी मिळणार आहे हे निश्चित. आजवर आनंदीबाई इंदूच्या कायम विरोधातच होती. ही मुलगी आपल्या आसपास नको, घरातच नको असं म्हणत आली आहे. इंदूने आजवर हे सगळे सहन देखील केले आहे. यासगळ्या परिस्थितीमध्ये इंदू व्यंकू महाराजांकडून कीर्तन देखील शिकते. आनंदीबाईने इंदूची माफी मागणे, संपूर्ण गावामध्ये बोलबाला झाला आहे ज्यामध्ये सगळ्यांना इंदूचे कीर्तन ऐकण्याची उत्सुकता निर्माण होते ज्याचा आनंदीला खूप त्रास होतो आहे. पण या गोष्टीचा फायदा आता आनंदीबाई घेणार आहे. इंद्रायणी बरोबर आनंदीबाई आता चांगलं वागणार आहे. या नवीन ट्रॅकसाठी आमच्या टीमने एक वेगळा विचार केला आहे.

अनिता दाते पुढे म्हणाली की, आनंदीबाई आतापर्यंत ज्यापद्धतीने दिसत होती ती तशी न दिसता आनंदीचे एक वेगळे रूप प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. कदाचित ते फसवं आहे पण याक्षणी इंद्रायणीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी ते तिला योग्य वाटते आहे . यासाठी आमच्या डिझानयरने वेगळ्या पद्धतीच्या साड्या दिल्या आहेत ज्यामध्ये ती सात्विक दिसेल, अतिशय साधा लूक असणार आहे. यासगळ्या दरम्यान आंनदी इंदूच्या मनात विश्वास निर्माण करणार आहे कि, ती जो विचार करते आहे इंदूसाठी तो तिच्या भल्यासाठी आहे. आजवर इंदूला कधीही न मिळालेलं प्रेम आनंदीकडून मिळणार आहे. या नव्या ट्रॅकसाठी मी खूपच उत्सुक आहे. या पुढचे भाग अधिकाधिक रंजक असणार आहेत आणि प्रेक्षकांना ते आवडतील अशी माझी आशा आहे.