अभिनेता कमाल आर खान म्हणजेच (KRK) वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतो. केआरके ट्विटरद्वारे बॉलिवूड तसेच हिंदी चित्रपटांवर निशाणा साधताना दिसतो. त्याच्या वादग्रस्त ट्वीटमुळे तो वादाच्या भोवऱ्यातही अडकला आहे आणि त्याला तुरुंगात पण जावे लागले आहे. मात्र तरीही तो सोशल मीडियावरून व्यक्त होत बॉलिवूडमधील सेलिब्रेटींना टार्गेट करत असतो. यावेळी त्याने बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेता सलमान खान यांचा उल्लेख करत एक ट्वीट केले आहे जे चर्चेत आले आहे.
अमिताभ बच्चन यांनी कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल भाष्य केले होते. त्यावर आता केआरके प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, अमिताभ बच्चन सरांनी म्हटले आहे की नागरिकांच्या स्वातंत्र्यावर कोणतीही बंधने लादली जाऊ नये. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश लावू नये. मग संपूर्ण बॉलिवूड माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणण्यासाठी मला मारायचा प्रयत्न का करताय? सलमान खान, वाशू भगनानी हे निर्माते माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य रोखण्यासाठी न्यायालयात का गेले?” असा सवाल केआरकेने केला आहे.
केआरकेने पुढे लिहिले की, तुम्ही सर्व तथाकथित सुपरस्टार एका चित्रपटासाठी १२५ कोटी रुपये घेता आणि नंतर समीक्षकांच्या रिव्ह्यूला घाबरता. त्यामुळे तुमचे बकवास चित्रपट सुपरहिट करण्यासाठी तुम्हाला त्याला मारायचे आहे. म्हणूनच माझ्यासाठी तुम्ही सुपरस्टार नाहीत, तुमच्या अशा दयनीय जीवनावर थू आहे. जर मला धमकावले जात असेल तर सुशांत सिंग राजपूतालाही धमकी दिली गेली असेल. जर मला मारण्याचा प्रयत्न केला जात असेल तर सुशांतलाही मारले गेले असावे.
यापूर्वी दोन ट्विटमध्ये केआरकेने मोठा दावा केला होता. तो म्हणाला होता की, माझ्या वकिलांनी सर्व एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी पत्रकार परिषद घेऊन जगाला सांगेन की माझ्या नावाची सुपारी कोणी दिली आहे आणि तुरुंगात मला मारण्याचा प्रयत्न कोणी केला होता. एका अभिनेता + एक राजकारणी + एका पोलीस अधिकाऱ्याने तो कट रचला होता.
मुंबई पोलिसांनी कमाल आर खानला २९ ऑगस्ट रोजी एअरपोर्टवरुन अटक केली होती. २०२० मध्ये केलेल्या दोन ट्वीटमुळे त्याला अटक करण्यात आली होती. त्याने दोन वर्षांपूर्वीच्या ट्वीटमध्ये दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेता इरफान खान यांच्यासाठी अपमानास्पद लिहिले होते. त्यासंदर्भात झालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती.