Join us  

लोकसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंचा किरण मानेंना फोन; अभिनेत्याची पोस्ट, म्हणतो- "त्यांचे दोन मिस्ड कॉल्स..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 11:46 AM

लोकसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंनी किरण मानेंना फोन केला होता. याबाबत अभिनेत्याने पोस्ट लिहिली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता किरण माने कायमच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबाबत ते चाहत्यांना पोस्टद्वारे माहिती देताना दिसतात. समाजातील घडामोडींवर आणि राजकारणावर किरण माने अनेकदा स्पष्टपणे त्यांची मतंही मांडताना दिसतात. त्यांच्या पोस्ट या कायमच चर्चेचा विषय असतो. लोकसभा निवडणूक आणि निकालानंतर त्यांनी काही पोस्ट केल्या होत्या. आतादेखील त्यांच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

किरण मानेंनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी पोस्ट लिहिली आहे. नुकतीच लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपून निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ९ जागांवर विजय मिळवला. याचं श्रेय उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबरच किरण मानेंनाही दिलं आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंनी किरण मानेंना फोन केल्याचं अभिनेत्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

किरण मानेंची पोस्ट

फोन सायलेंटवर होता. सहज हातात घेतला. बघतोय तर पंधरा मिनिटांपूर्वी उद्धवजींचे दोन मिस्ड कॉल्स येऊन पडले होते! नंतर 'जय महाराष्ट्र' असा मेसेज येऊन पडला होता. मी कॉलबॅक केला...उद्धवजींनी उचलला. मी काही बोलायच्या आधी त्यांनी बोलायला सुरूवात केली...

 

"किरणजी, महाराष्ट्रातल्या विजयात तुमचाही वाटा आहे. तुम्ही जे अफाट कष्ट घेतलेत त्याबद्दल आभार. सोबत राहू कायम." उद्धवजी बाळासाहेब ठाकरे माझ्याशी खुप काही बोलत होते...माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू...शिवबंधनाचं सार्थक व्हायला सुरूवात झाली...भाग गेला सीण केला । अवघा झाला आनंद ।।

किरण मानेंच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. किरण मानेंनी काही महिन्यांपूर्वीच हातावर शिवबंधन बांधत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेकिरण मानेलोकसभा निवडणूक २०२४ निकालशिवसेना