Join us  

अमिताभ बच्चनमुळे 'पंचायत' फेम अभिनेत्याने गमावलं हातचं काम; खरं बोलल्याचे भोगावे लागले परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 11:29 AM

Faisal malik: बिग बींसमोर फैसलने सत्य सांगितलं आणि त्याचक्षणी त्याने त्याच्या हातचा प्रोजेक्ट गमावला. फैसलने एका मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं.

सध्या सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत फक्त आणि फक्त 'पंचायत 3' या वेबसीरिजची चर्चा सुरु आहे. नुकताच या सीरिजचा तिसरा सीजन रिलीज झाला आहे. उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यांच्या जोरावर ही सीरिज पुन्हा एकदा लोकप्रिय ठरली आहे. त्यामुळे त्यातील प्रत्येक कलाकार, डायलॉग, सीन यांची सोशल मीडियावर चर्चा रंगतीये. यामध्येच सीरिजमधील प्रल्हाद चा म्हणजेच अभिनेता फैसल मलिक (Faisal Malik) याची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चनमुळे ( Amitabh Bachchan) त्याने त्याचं हातचं काम गमावल्याचं म्हटलं होतं. 

'पंचायत 3' रिलीज झाल्यानंतर फैसल याची जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने अमिताभ यांची भेट घेतल्यानंतर त्याच्या हातून त्याचा प्रोजेक्ट गेला, असा खुलासा केला. विशेष म्हणजे अनुराग कश्यप स्वत: फैसलला बिग बींच्या भेटीला घेऊन गेले होते.

"मुळात बच्चन साहेबांची भेट होणार या विचारानेच मी खूश झालो होतो. त्यांना पाहिल्यावर मला काही सुचलंच नाही. म्हटलं खड्ड्यात गेलं ते काम आधी मी त्यांचा ऑटोग्राफ घेतो. त्यांच्या घरी गेल्यावर आमच्यासमोर खाण्याचे एकावर एक पदार्थ येत होते. यावेळी बोलत असतांना मी अलाहाबादचा असल्याचं त्यांना सांगितलं आणि मग आमच्या गप्पा सुरु झाल्या. मी अलाहाबादचं असल्याचं त्यांना समजताच त्यांनी तिळाचे लाडू खाणार? असं विचारलं. त्यानंतर त्यांनी लगेच लाडू मागवून घेतले. मला वाटलं त्यांचं वय पाहता त्यांना ते लाडू खाता येणार नाहीत. पण, माझ्या आधी त्यांनीच दोन लाडू फस्त केले. ते खरोखरच वयाच्या मानाने खूप तरुण आहेत", असं फैसल म्हणाला.

फैसलने गमावली नोकरी

"स्क्रिप्ट रिडींग सेशन दरम्यान जो माणूस स्क्रिप्ट वाचत होता त्या ओव्हर कॉन्फिडेंट होता. पण, बिग बींना ६२ नंबरच्या पेजवर चूक सापडली. त्यांनी १२० पेजची सगळी स्क्रिप्ट लक्षात होती. विशेष म्हणजे चूक दाखवण्यासाठी त्यांनी स्क्रिप्ट पाहिली सुद्धा नाही. स्क्रिप्ट रिडींग सेशननंतर त्यांनी लगेच विचारलं की, तुम्ही कसला विचार करताय की, आम्ही याचं शूट कधी सुरु करणार हाच ना? त्यांच्या या प्रश्नावर, सर आपण हे आता शूट नाही करु शकत. आपण सहा महिन्यानंतर याचं शूट करुयात, असं मी म्हटलं. मिटींग संपल्यानंतर ज्यावेळी आम्ही त्यांच्या घराबाहेर पडलो त्यावेळी मला सांगण्यात आलं की, यापुढे तू या प्रोजेक्टवर काम करणार नाहीस. तुला हा प्रोजेक्ट सोडावा लागेल. मी बिग बींसमोर खरं बोललो त्याचा हा परिणाम होता.

टॅग्स :वेबसीरिजअमिताभ बच्चनअनुराग कश्यपसेलिब्रिटीसिनेमा