पटसंख्या रोडावली
By admin | Published: August 5, 2014 11:25 PM2014-08-05T23:25:16+5:302014-08-05T23:25:16+5:30
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या नियंत्रणात एकात्मिक बकालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत जिल्हाभरात एकूण १ हजार ७७१ अंगणवाड्या तर ५१८ मिनी अंगणवाड्या
कॉन्व्हेंटचा परिणाम : शहरातील अंगणवाड्या पडत आहेत ओस
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या नियंत्रणात एकात्मिक बकालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत जिल्हाभरात एकूण १ हजार ७७१ अंगणवाड्या तर ५१८ मिनी अंगणवाड्या अशा एकूण २ हजार २८९ अंगणवाड्या सुरू आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अंगणवाडीमध्ये मुलांची संख्या समाधानकारक आहे. मात्र शहरी भागातील अंगणवाड्यांमधील मुलांची पटसंख्या रोडावत आहे. यामुळे शहरातील अंगणवाड्या ओस पडत असल्याचे दिसून येते.
० ते ६ वयोगटातील मुलांच्या आरोग्य व आहाराबाबत महिला व बालकल्याण विभाग प्रयत्नशिल आहे. अंगणवाड्यांच्या माध्यमातून सदर विभाग मुलांचा शारीरिक व मानसिक विकास करण्यासाठी विविध योजना राबवित आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाचे केंद्र म्हणून अंगणवाडीला महत्वाचे स्थान आहे. मात्र शासनाने मोठ्या शहरात तसेच तालुक्याच्या ठिकाणी व मोठ्या खेडेगावात इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंट शाळांना मान्यता दिली. इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन अनेक पालकांनी आपल्या अडीच ते सहा वयोगटातील मुलांना इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटमध्ये दाखल करीत आहे. यामुळे शहरी भागातील अंगणवाडींमध्ये केवळ १५ ते २० मुले पटावर असल्याचे दिसून येते. एटापल्ली तालुक्यात एकूण २२०, भामरागड १३५, अहेरी २५३, कुरखेडा १९१, कोरची १५०, आरमोरी १९१, देसाईगंज ८७, चामोर्शी ३३१, मुलचेरा ११६, धानोरा २९५, गडचिरोली १५२ व सिरोंचा तालुक्यात १६८ अंगणवाडी व मिनी अंगणवाड्या आहेत. ३ ते ५ वर्ष वयोगटातील २ हजार ५९२ मुले, एटापल्ली तालुक्यातील २२० अंगणवाड्यांमधून पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे घेत आहे. याच वयोगटातील भामरागड तालुक्यात १३५ अंगणवाड्यांमधून १ हजार ३४८ मुले पूर्व प्राथमिक शिक्षण घेत आहेत. अहेरी तालुक्यात २५३ अंगणवाड्यांमध्ये एकूण ३ हजार ४११ मुले दाखल आहेत. कुरखेडा तालुक्यात १९१ अंगणवाड्यांमध्ये २ हजार ४५३ मुले दाखल आहेत. सदर आकडेवारी ग्रामीण भागातील आहे. मात्र शहरी भागातील अंगणवाड्यांमधील मुलांची पटसंख्या गेल्या तीन-चार वर्षांपासून कमी होत आहे. शहरी भागातील अंणवाड्यांमध्ये केवळ १५ ते २० मुले दाखल असल्याचे दिसून येते. पटसंख्या वाढण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाची गरज आहे.