वर्षभरात ७४ हजार ९१६ दाखले वितरित
By admin | Published: August 1, 2014 12:16 AM2014-08-01T00:16:12+5:302014-08-01T00:16:12+5:30
राज्य शासनाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात आॅगस्ट २०१२ पासून सुवर्ण जयंती राजस्व अभियानाला प्रारंभ करण्यात आला. २०१३-१४ या वर्षात सप्टेंबर २०१३ ते जून २०१४ पर्यंत या कार्यक्रमाचे
५८६ शिबिर : प्रशासन आपल्या दारी उपक्रम
गडचिरोली : राज्य शासनाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात आॅगस्ट २०१२ पासून सुवर्ण जयंती राजस्व अभियानाला प्रारंभ करण्यात आला. २०१३-१४ या वर्षात सप्टेंबर २०१३ ते जून २०१४ पर्यंत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत सन २०१३-१४ या वर्षात जिल्हाभरात एकूण ५८६ शिबिर घेण्यात आले. या शिबिरातून एकूण ७४ हजार ९१६ दाखले वितरित करण्यात आले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने गडचिरोली जिल्ह्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या अभियानांतर्गत सन २०१३-१४ या वर्षात गडचिरोली तालुक्यात महसूल विभागाच्यावतीने ५३ शिबिर घेण्यात आली. या शिबिरात एकूण ५ हजार ७७६ दाखले वितरित करण्यात आले. धानोरा तालुक्यात ३५ शिबिर आयोजित करून एकूण ३ हजार १०० दाखले वितरित करण्यात आले. चामोर्शी तालुक्यात ४३ शिबिर आयोजित करून ५ हजार ८८० दाखले वितरित करण्यात आले. मुलचेरा तालुक्यात १६ शिबिराच्या माध्यमातून १ हजार ८५१ तर देसाईगंज तालुक्यात २१ शिबिर आयोजित करून १० हजार १३२ दाखले वितरित करण्यात आले. आरमोरी तालुक्यात ५४ शिबिर आयोजित करून ८ हजार ८७८ तर कुरखेडा तालुक्यात २६ शिबिराच्या माध्यमातून एकूण ४ हजार ८५३ दाखले वितरित करण्यात आले. कोरची तालुक्यात २६ शिबिराच्या माध्यमातून १ हजार ६०४, अहेरी तालुक्यात ६९ शिबिराच्या माध्यमातून एकूण ७ हजार २७७ दाखले वितरित करण्यात आले. सिरोंचा तालुक्यात ७६ शिबिर आयोजित करून एकूण १ हजार ६५२ तसेच एटापल्ली तालुक्यात १०५ शिबिर आयोजित करून एकूण ११ हजार ४३१ दाखले वितरित करण्यात आले आणि अतिदुर्गम भामरागड तालुक्यात ६२ शिबिर आयोजित करून एकूण २ हजार ४८२ दाखले नागरिकांना वितरित करण्यात आले. वितरित करण्यात आलेल्या दाखल्यांमध्ये जात, रहिवासी, नॉन क्रिमीलेअर, उत्पन्न तसेच अधिवास प्रमाणपत्रांचा समावेश आहे.
सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात ४० महसूल मंडळांतर्गत २०१३-१४ या वर्षात एकूण २०० फेरफार अदालती घेण्यात आल्या असून यामध्ये एकूण ९ हजार १४९ फेरफाराच्या नोंदी निकाली काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. राजस्व अभियानांतर्गत वर्षभरात १०४ अतिक्रमीत पांदन रस्त्यांपैकी ८५ पांदनरस्ते अतिक्रमण विरहित करण्यात आले. या महसूल मंडळावर एकूण १०५ महसूल अदालती आयोजित करण्यात आल्या. यामध्ये ३३१ प्रकरणात कारवाई करण्यात आली. भूसंपादन प्रकरणात एकूण ६२ निवाड्याचे ४६ कजाप प्राप्त झाले. सदर कजापचे फेरफार घेऊन ५५७ सातबाऱ्याची दुरूस्ती करण्यात आली असल्याचीही माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. राजस्व अभियानांतर्गत एकूण १ हजार २२६ गावात गाव नमुना ८ अ चे चावडी वाचन करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)