जारावंडीत शाळा बंद आंदोलन
By admin | Published: August 4, 2014 11:44 PM2014-08-04T23:44:34+5:302014-08-04T23:44:34+5:30
आदिवासी विकास महामंडळांतर्गत सन २०१०-११ या वर्षात जारावंडी येथील ६ कोटी रूपयांचे धान्य खरेदी करण्यात आले. सदर धान्य गोदामाबाहेर ठेवल्याने चार वर्षात पूर्णत: सडून गेले आहे.
एटापल्ली : आदिवासी विकास महामंडळांतर्गत सन २०१०-११ या वर्षात जारावंडी येथील ६ कोटी रूपयांचे धान्य खरेदी करण्यात आले. सदर धान्य गोदामाबाहेर ठेवल्याने चार वर्षात पूर्णत: सडून गेले आहे. धान्य सडलेले असतांनाही धान्यांची उचल करण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक व जवळ असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. महामंडळाने सडलेले धान्य त्वरित उचलावे, म्हणून गावकऱ्यांनी शाळा बंद आंदोलनास सुरूवात केली आहे. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या ३५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
सडलेल्या धान्याची विल्हेवाट लावावी म्हणून मागील तीन वर्षांपासून नागरिकांनी वारंवार आंदोलन केले. प्रशासनाकडे धान्याची उचल करण्याबाबत वारंवार निवेदनही सादर केले. परंतु प्रशासनाने नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. सडलेल्या धान्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे, हे कारण समोर करून जारावंडी येथील नागरिकांनी १ आॅगस्टपासून शाळा बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला होता. परंतु पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कुलूप ठोकण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. जारावंडी येथे २०१०-११ ला १ हजार क्विंटल धान खरेदी आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात आली. परंतु सदर धान्य गोदामात न ठेवता शाळेच्या आवारात ठेवण्यात आले. त्यामुळे सडलेल्या धान्याची दुर्गंधी परिसरात पसरत होती. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागले. अनेक विद्यार्थी धानाच्या दुर्गंधीमुळे आजारीही पडले. त्यामुळे अनेक पालकांनी पाल्यांना शाळेत पाठविणेच बंद केले. शाळेजवळच अंगणवाडी, ग्रामपंचायत, वनविभाग निवासस्थान तसेच खासगी दुकान व आठवडी बाजारपेठ आहे. त्यामुळे यांनाही या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. धान्याची तीन दिवसात उचल न झाल्यास ग्रामपंचायमार्फत धान उचलून फेकले जाईल, याची सर्वस्वी जबाबदारी महामंडळाची राहील असा ठराव ग्रामसभा बोलवून नुकताच पारित करण्यात आला. शाळा बंद आंदोलनामुळे जिल्हा परिषद शाळेतील १ ते ७ पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सडलेल्या धानाची त्वरित करावी, अशी मागणी जारावंडीचे सरपंच देवनाथ सोनुले, पदाधिकारी शालिकराम गेडाम, दत्तूजी मडावी, दिलीप दास, सुरेश तलांडे, दिनेश माठे, देविदास मोहुर्ले, शरिफ पठाण, सुधाकर टेकाम यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)