मानापूर/देलनवाडी : यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातील पावसाने दगा दिला. त्यानंतर उशीरापर्यंत पावसाळ्याला सुरूवात झाली. ८ ते १० दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. मानापूर-रांगी परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली आहे. या भागातील जलस्त्रोतही अर्धवट स्थितीतच आहेत.मानापूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांना दुबार धान पेरणी करावी लागली. त्यानंतर अल्प पाऊस झाल्याने थोड्याफार शेतकऱ्यांनी रोवणी हंगामाला सुरूवात केली. परंतु पाऊस फार काळ टिकला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना रोवणी हंगामाला सुरूवात केली होती. अशा शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली आहे. अनेक शेतकऱ्यांची रोवणी वाळवी लागण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मानापूर परिसरातील भाकरोंडी, रांगी, बेलगाव, मोहली, निमगाव, निमनवाडा, पिसेवडधा परिसरातील तळी, बोडी व इतर जलस्त्रोत अजूनही पूर्णत: भरले नाही. मागील १५ दिवसापूर्वी आलेल्या पावसाने खरीप हंगामाला सुरूवात करून दिली होती. परंतु अल्पावधीतच पावसाने शेतकऱ्यांना दगा दिला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, असे शेतकरी आपली रोवणी पूर्ण करण्याच्या कामाला लागले आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या साधनांचा अभाव आहे, असे शेतकरी अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाला आठ दिवस उशीर झाल्यास धान पिकाच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मानापूर-रांगी परिसर पावसाअभावी कोरडाच
By admin | Published: August 03, 2014 11:24 PM