गडचिरोली : अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून परिवर्तन करण्याचे आमिष देऊन यूतीने केंद्रात सत्ता मिळविली. मात्र केंद्र शासनाने केलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे ‘बुरे दिन’ आले आहेत. अजित पवार यांच्या रूपाने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यात परिवर्तन नक्कीच होऊ शकते. अजित पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळणार आहे, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा गडचिरोलीच्यावतीने येथील पटेल मंगल कार्यालयात आयोजित युवक काँग्रेसच्या मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी राकाँचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, युकाँच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षा शामकुळे, राकाँचे प्रदेश सचिव सुरेश पोरेड्डीवार, ऋतूराज हलगेकर, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास गोडसेलवार, कार्यकारी अध्यक्ष अजय कुंभारे, राकाँचे कार्यकारी अध्यक्ष बबलू हकीम, चेतन राजकारणे, अमित उमरे, अशोक कत्रोजवार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना उमेश पाटील म्हणाले, युतीच्या केंद्र शासनाने कृषी मुल्य आयोगांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतमालाला मुळीच भाववाढ दिली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष आहे. केंद्र शासनाने रेल्वे, पेट्रोल डिझेल व अन्य सर्वच वस्तुंची भाववाढ केली. यामुळे सर्वसामान्य जनता होरपडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण कमी करण्याचा पाप युती सरकारने १९९५ मध्ये केले. गडचिरोली जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे तिनही आमदार निवडून आल्यास मंत्रालयासमोर आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणार अशीही ग्वाही यावेळी त्यांनी दिली. संचालन रिंकू पापडकर, प्रास्ताविक श्रीनिवास गोडसेलवार यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदावर दावा कायम- उमेश पाटील
By admin | Published: August 04, 2014 11:43 PM