स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही मणेरमळा रस्त्यापासून वंचित
By admin | Published: December 9, 2015 09:29 PM2015-12-09T21:29:41+5:302015-12-10T01:03:44+5:30
खडकाळ रस्ता असल्याने बस किंवा रिक्षा या भागात येण्यास तयार होत नाहीत. वेळेवर उपचार मिळाले नसल्याने चार गरोदर मातांना आपला प्राण गमवावा लागला आहे
उचगाव : येथील यादववाडी, छत्रपती शिवाजीनगर परिसर विकास मंडळ (मणेरमळा) परिसरातील १२ कॉलन्यांतील रहिवासी, महिला मंडळ, युवक मंडळ, दहा ते १५ हजार नागरिकांच्यावतीने उचगावच्या सरपंच सुरेखा चौगुले यांना मणेरमळ््यातील रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले. स्वांतत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही मणेरमळ््यात रस्ता नसल्याने ‘कुठे नेऊन ठेवलाय आमचा रस्ता’ असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. कोल्हापूर-हुपरी रोडला जोडला जाणारा यादववाडी, छत्रपती शिवाजीनगर परिसर, मणेरमळा हा रस्ता ४० वर्षे वहिवाट असणारा रस्ता व्हावा म्हणून गेली १२ ते १५ वर्षे येथील जनता उपोषण, रास्ता रोको, मोर्चा, आंदोलन करीत आहे. खासदार, आमदार, मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारीयांनी वेळोवेळी रस्ता करतो म्हणून हमी दिली आहे; परंतु येथील जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न असणारा दक्षिणोत्तर जवळपास २०० मीटरचा रस्ता आजअखेर नागरिकांना मिळालेला नाही.‘वाडी-वस्ती तिथे रस्ता’ हा केंद्र सरकारचा नियम येथील जनतेला लागू होत नाही का? आदिवासी, दुर्गम भाग या ठिकाणी रस्ते केले जातात. मग कोल्हापूर शहरापासून दोन कि.मी.च्या अंतरावर असणारा हा भाग रस्त्यापासून अजूनही वंचित का रहिला, असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे. या रस्त्याने दररोज हजार ते दीड हजार मुले-मुली, नागरिक, वाहनधारक, नोकरदार ये-जा करीत आहेत. शाळा, कॉलेजला जाणारी मुले, मुली, युवक चिखलातून जात आहेत. आजारी रुग्ण, गरोदर मातांना रस्त्याअभावी चारचाकी वाहनातून वेळेत उपचारांसाठी पोहोचता येत नाही. यामुळे गेल्या काही दिवसांत पाच ते दहाजणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. खडकाळ रस्ता असल्याने बस किंवा रिक्षा या भागात येण्यास तयार होत नाहीत. वेळेवर उपचार मिळाले नसल्याने चार गरोदर मातांना आपला प्राण गमवावा लागला आहे. दहा ते १५ हजार लोकवस्तीच्या या मणेरमळ््यात वाहतुकीसाठी रस्ता नसल्याने व खासगी जमीनदारांकडून रस्त्याला अडवणूक होत असल्याने येथील रस्ता होणार तरी कधी? असा प्रश्न पडला आहे.गेली वीस वर्षे ग्रामपंचायतीला या भागातील नागरिक घरफाळा, इतर कर भरत आहेत. तरीही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी या रस्त्याविषयी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप जनतेतून होत आहे. वास्तविक ग्रामपंचायतीने येथील जनतेला विश्वासात घेऊन हा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक असताना गेली २० वर्षे दुर्लक्ष केल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर येथील जनतेने मोर्चाने येऊन ग्रामपंचातयीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)