कोल्हापूर : कारखान्याला आमचे नाव लावायला आम्ही काही सतेज पाटील नाही. रात्रंदिवस फक्त ७/१२ आणि जमीन एवढेच विचार या व्यक्तीच्या डोक्यात असतात का ? असा प्रश्न मला पडतो असा टोला माजी आमदार अमल महाडिक यांनी लगावला आहे.
सतेज पाटील यांनी उद्या होणाऱ्या राजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सभा घेऊन महाडिक यांच्यावर टीका केली होती. त्याला महाडिक यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले आहे.
पत्रकात महाडिक म्हणतात, राजाराम कारखान्यात मागील ३० वर्षे आम्ही सत्तेत असताना कारखान्याचा ७/१२ आणि नाव आहे तसं जपलं. याउलट सतेज पाटलांनी मात्र सप्तगंगा साखर कारखाना ताब्यात घेताच कारखान्याचे नाव बदलले. एवढंच नाही तर १०००० सभासद एका रात्रीत कमी केले. किमान 'अजिंक्यतारा' या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा ७/१२ आधी कोणाच्या नावावर होता आणि आता कोणाच्या नावावर आहे, एवढं तरी त्यांनी जाहीर करावे.
आज डी. वाय. पाटील साखर कारखान्याची वार्षिक सभा कधी होते ? अहवाल छापला जातो का नाही ? हेही तिथल्या सभासदांना माहिती नाही. आज ज्या सभासदांना बोगस सभासद म्हणून बाजूला काढण्याचा घाट घातला गेलाय, त्या सर्वांना सभासदत्व देताना सतेज पाटील यांचे सहकारी कै. विश्वास नेजदार हेच चेअरमन होते. आज ‘उंदराला मांजर साक्ष’ असल्याप्रमाणे जे सर्जेराव माने त्या व्यासपीठावर बसलेत, ते तेव्हाही संचालक होते.
ही तर गावगुंडासारखी भाषा
‘सभेनंतर बावड्यातून बाहेर जाणे महाग होईल’ ही सतेज पाटील यांची गावगुंडासारखी भाषा असेल, तर यांच्या नजरेत इतर १२१ गावच्या सभासदांची काय किंमत आहे ? याचा विचार सभासद नक्कीच करतील. राहता प्रश्न राहिला बावड्याचा तर आमचेही ३० वर्षे बावड्यात संबंध आहेत. बावडा ही जहागिरी असल्यासारखी भाषा वापरून बावड्याची बदनामी करू नये, असेही महाडिक यांनी पत्रकात म्हटले आहे.