सुरेश लोखंडे,
ठाणे- शाळेत दररोज सर्वच विद्यार्थी हजर असतात असे नाही, काही विद्यार्थी गैरहजरदेखील असतात. त्यांचा त्या दिवसाच्या शालेय पोषण आहाराचा तांदूळ शिल्लक असतो. या गैरहजर विद्यार्थ्यांचा महिन्याभराच्या शिल्लक राहिलेला तांदूळ विचारात घेऊन उर्वरित विद्यार्थ्यांसाठीच त्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र, तसे न होता जिल्ह्यातील पाच लाख २९ हजार १८२ माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मिड डे मिलसाठी बिनबोभाट दरमहा शेकडो क्विंटल तांदळाचा पुरवठा केल्याचे भासवून त्यापोटी लागणाऱ्या रक्कमांचे अनुदान बिनदिक्कत लाटल्याची असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील दोन हजार ७४५ प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पाच लाख २९ हजार १८२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इयत्ता पहिली ते ५ वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज १०० गॅ्रम व ६ वी ते ८ वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला १५० ग्र्रॅम या प्रमाणात मिड डे मिल दिले जात असल्याचा शालेय विभागाचा दावा आहे. पण ही पटावरील विद्यार्थी संख्या आहे. त्यास अनुसरून प्रत्येक महिन्याला शेकडो क्विंटल तांदूळ पुरवठा या शाळामध्ये होतो. पण गैरहजर विद्यार्थ्यांचे शिल्लक धान्य पुरवठ्यातून कमी होणे अपेक्षित आहे. तसे होत नसून पटावरील विद्यार्थी संख्या विचारात घेऊन साहित्याचा पुरवठा केला जातो.हजर असूनही बहुतांश विद्यार्थी आहार घेत नाहीत. तर काही मोठ्या शाळांचे विद्यार्थी आहार घेत नाहीत. तरीही त्यांच्या नावे पुरवठा झाल्याची नोंद दरमहा आढळून आलेली आहे. मात्र, यास दुजोरा न देता विद्यार्थ्यांची हजेरी आॅनलाईन घेऊन त्यानुसार अनुदान देण्यात येत असल्याचे शिक्षण खात्याचे म्हणणे आहे. >फुटकळ रकमांची तरतूदमहिन्याभरात तांदळासह कडधान्य, तूरडाळ, मूगडाळ, मसूरडाळ, तेल, मसाला, मीठ, हळद, जिरे इत्यादींचा पुरवठा महापालिका, नगरपालिका, ग्रामीण शाळांमध्ये केला जातो. पाचवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी १०० गॅ्रम आहार देण्यासाठी प्रतिविद्यार्थी तीन रूपये ८६ पैसे, तर सहावी व आठवीच्या विद्यार्थ्याला १५० ग्रॅम आहारासाठी पाच रूपये ७८ पैसे खर्च केला जातो.