कल्याणच्या तहसीलदार कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य
By Admin | Published: September 10, 2016 03:13 AM2016-09-10T03:13:09+5:302016-09-10T03:13:09+5:30
सार्वजनिक स्वच्छतेवर भर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१४ पासून ‘स्वच्छ भारत’ अभियानाची मुहूर्तमेढ रोवली.
आकाश गायकवाड,
डोंबिवली- सार्वजनिक स्वच्छतेवर भर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१४ पासून ‘स्वच्छ भारत’ अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. या अभियानाचे नियंत्रण त्यात्या शहरांचे तहसीलदार तसेच महापालिकांवर सोपवण्यात आली आहे. मात्र, ऐतिहासिक कल्याण शहराच्या तहसीलदार कार्यालयाच्या परिसरातच घाणीचे साम्राज्य आहे. या परिसरात अनेक सरकारी कार्यालये आहेत. त्यातील कर्मचारी व येथे येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या परिसराची त्वरित स्वच्छता करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कल्याण पश्चिमेला रेल्वेस्थानकानजीक तहसीलदार कार्यालय आहे. या कार्यालयाच्या परिसरात महात्मा फुले चौक पोलीस ठाणेही आहे. कार्यालयाच्या मागे कल्याण येथील पोलिसांचा सोनसाखळी चोरीप्रतिबंधक विभाग, गुन्हे अन्वेषण शाखा आदी कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये दररोज कल्याण-डोंबिवली शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातून महसुली तसेच पोलीस ठाण्याच्या कामांसाठी शेकडो नागरिक येतात. तहसील कार्यालयाच्या आवारात मागील बाजूस असलेल्या स्वच्छतागृहाची कित्येक दिवस स्वच्छताच करण्यात आलेली नाही. शौचालयात घाणीचे साम्राज्य आहे. त्यातील नळ, दरवाजेही तुटलेले आहेत. अनेकदा पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय होते. अन्यत्र शौचालय नसल्याने नागरिक व कर्मचाऱ्यांना नाक दाबूनच शौचालयात जावे लागत आहे. काही जण तेथे आडोसा शोधून लघुशंका करत असल्याची तक्रार काही कर्मचाऱ्यांनी केली. त्यामुळे महिला त्रस्त आहेत.
तहसील कार्यालयामागील बाजूस पोलिसांनी गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या दुचाकी ठेवल्या आहेत. या गाड्या अनेक वर्षांपासून तेथे पडल्याने त्यांना गंज चढला आहे. या परिसरातील कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी कूलर व शुद्ध पाणी पिण्याची सुविधा नाही. त्यामुळे त्यांना बाटलीबंद पाणी विकत आणावे लागत आहे. कर्मचाऱ्यांना सायंकाळी व रात्री डासांच्या उपद्रवाला सामोरे जावेलागते. उंदीर आणि घुशींनी तर संपूर्ण कोपरे पोखरून काढले आहेत.
सध्या पावसाळ्यात काही कार्यालयांत गळती लागली आहे. ओलाव्यामुळे भिंतींचेपापुद्रेनिघाले आहेत. तसेच कुबट दर्पामुळे कर्मचारी व अधिकारी आजारी पडत आहेत. कार्यालयातील अनेक महत्त्वाची कागदपत्रे खराब झाली आहेत.
तहसीलदार कार्यालयाच्या परिसरातील घाण व दुर्गंधीमुळे पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला एक प्रकारे हरताळच फासला गेला आहे. या कार्यालयाच्या आवारातच स्वच्छता नसेल, तर येथील अधिकारी शहराची काय स्वच्छता ठेवणार?
- दीपक गुप्ता, विद्यार्थी.