केवळ आश्वासन नको, ठोस कृती करा
By admin | Published: September 10, 2016 03:14 AM2016-09-10T03:14:15+5:302016-09-10T03:14:15+5:30
शहरातील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या एमआयडीसी परिसरातील क्रीडा संकुलातील सात कंत्राटी कर्मचाऱ्यांची व्यथा ‘लोकमत’ने मांडली होती.
डोंबिवली : शहरातील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या एमआयडीसी परिसरातील क्रीडा संकुलातील सात कंत्राटी कर्मचाऱ्यांची व्यथा ‘लोकमत’ने मांडली होती. त्याची दखल घेत महापौर व सभागृह नेत्यांनी त्यांना नोकरीत कायम करून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यास चार महिने उलटले असून प्रत्यक्षात काहीच झालेले नाही. त्यामुळे महापौरांचे केवळ आश्वासन नको कृती करावी, अशा शब्दांत कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जलतरण तलावात प्रशिक्षक व जीवरक्षक, असे सात कर्मचारी आठ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर नोकरी करत आहेत. कंत्राटदार त्यांना अत्यल्प मानधन देतो. महापालिकेने त्यांना कायम सेवेत घेतलेले नाही. यासंदर्भात १९ जुलैच्या महासभेत सभागृह नेते राजेश मोरे यांनी प्रस्ताव ठेवला होता. त्यात त्या कर्मचाऱ्यांना चार हजार ५०० ते आठ हजार रुपये मानधन देण्यात येते. सध्याच्या महागाईचा विचार करता ते अपुरे आहे. ठाणे महापालिकेच्या आस्थापना सूचीवर ही पदे आहेत. त्यानुसार, डोंबिवलीच्या कर्मचाऱ्यांनाही महापालिकेच्या त्या प्रकल्पात सामावून घ्यावे, अशी सूचना केली होती. त्या वेळी हा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्याला सूचक म्हणून मोरे तर अनुमोदक सुधीर बासरे होते. पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर विक्रम तरे यांनी सर्वानुमते हा ठराव मंजूर केला आहे. पण, अजूनही त्या कर्मचाऱ्यांना महापालिकेने सेवेत कायम केलेले नाही. तलाव कंत्राटदाराचा कालावधी लवकरच संपत आहे. नव्याने कंत्राट दिले जाणार आहे. त्यामुळे आताच ही पदे कायम होऊ शकतात, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.