अकोला : कृषी सेवक सरळ सेवा पदभरती परीक्षेच्या निकालात राज्यातील सर्वच विभागांत घोळ झाल्याचे समोर आले आहे. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी त्याची तत्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘लोकमत’ने यासंदर्भात शुक्रवारी वृत्त दिले. सदर प्रकरणात जे मुद्दे समोर आले आहेत, त्याची चौकशी करून सत्य बाहेर आणले जाईल. कुणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश संबंधितांना दिल्याची माहिती फुंडकर यांनी ‘लोकमत’ला दिली.कृषी आयुक्तालयाने कृषी सेवकांच्या ७३० पदांसाठी ६ आॅगस्टला परीक्षा घेतली. ६५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी ५७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल ६ सप्टेंबरला जाहीर झाला. परीक्षेत एकच विद्यार्थी दोन ठिकाणी उत्तीर्ण झाला आहे. दोन भावांना सारखेच गुण मिळाले असून, त्यांच्या वयामध्ये केवळ सहा महिन्यांचे अंतर आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज असतानाही काही उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयाची अट ३८ वर्षे असतानाही दोन विद्यार्थ्यांचे ३८ पेक्षा अधिक वय असतानाही त्यांच्यावर विशेष मेहेरनजर दाखविण्यात आली आहे. असे अनेक घोळ विद्यार्थ्यांनीच उघड केले आहेत. त्यासोबतच प्रत्येक विभागात गुणवत्ता यादीमधील गुणांमध्ये मोठी तफावत आहे. त्याची कृषीमंत्र्यांनी दखल घेतली आहे. कृषी आयुक्तालयाने घेतलेल्या परीक्षेच्या निकालासंदर्भात विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी गंभीर आहेत. त्याची शहानिशा झाली पाहिजे. तक्रारींची दखल घेतली असून, कृषी आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे फुंडकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>सीआयडी चौकशीची काँग्रेसची मागणीकृषी खात्याचा कारभार माझ्याकडे असताना खात्यातील गैरप्रकाराला आळा घातला होता. भ्रष्टाचारामुळे एक मंत्री घरी गेलेले आहेत. आता कृषी खात्याचे मंत्री काय करतात, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला. सीआयडीकडून या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे, असे ते अहमदनगरमध्ये म्हणाले.
‘घोळा’ची चौकशी होणार!
By admin | Published: September 10, 2016 4:08 AM