नागपूर : १५ विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संयुक्त संघटनेच्यावतीने मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. सायंकाळी आयुक्त कार्यालयातील विभागीय भूमी अभिलेख कार्यालयात संघटनेच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास १६ तारखेपासून राज्यव्यापी संप करण्याचा इशाराही संघटनेच्यावतीने देण्यात आला. भूमी अभिलेख खाते तांत्रिक करण्यात यावे, या खात्यातील कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतनश्रेणी लागू करावी, लिपिकऐवजी भूमापक असे पदनाम तयार करावे, राज्यात २५ नवीन नगर रचना कार्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, या प्रमुख मागण्यांसह संघटनेच्या एकूण १५ मागण्या आहेत. यापूर्वी संघटनेने काळ्या फिती लावून आंदोलन केले होते व १२ आॅगस्टला धरणे कार्यक्रमानंतर संपाबाबत निर्णय घेण्यात येणार होता. त्यानुसार नागपूर विभागातील शेकडो कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी झाले व १६ तारखेपासून संपावर जाण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला, असे संघटनेचे राज्य अध्यक्ष श्रीराम खिरेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांची निदर्शने
By admin | Published: August 13, 2014 12:49 AM