मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने पाच मेट्रो मार्गांचे काम हाती घेण्यात आले आहे. यात दहिसर पश्चिम ते डी.एन.नगर (मेट्रो-२ अ), डी.एन.नगर ते मानखुर्द (मेट्रो-२ ब), कुलाबा-वांद्रे-सीप्झ (मेट्रो-३), वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली(मेट्रो-४) आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व (मेट्रो-७) या मेट्रो मार्गांचा समावेश आहे. यातील काही प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले असून, काही प्रकल्पांचे काम नव्या वर्षात हाती घेण्यात येणार आहे.एमएमआरडीएकडून या वर्षी दहिसर पश्चिम ते डी.एन.नगर, कुलाबा-वांद्रे-सीप्झ, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. डी.एन.नगर ते मानखुर्द आणि वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मेट्रो मार्गाचे काम नव्या वर्षात हाती घेण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या या प्रकल्पांमुळे दहिसर, वांद्रे पश्चिम, बीकेसी, मानखुर्द आणि ठाण्यासह अंधेरी पूर्व, घाटकोपर, मुलुंड आणि वडाळा हे परिसर एकमेकांशी जोडले जातील. मेट्रो-३ मुळे कुलाबा, काळबादेवी, गिरगाव, महालक्ष्मी, वरळी, दादर, धारावी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळ, एमआयडीसी, सीप्झ हे परिसर एकमेकांना जोडले जातील. (प्रतिनिधी)रोजगारनिर्मितीला मिळणार चालना- मेट्रोच्या या पाच मार्गांची एकूण लांबी १२४ किलोमीटर असेल. यावर 61,289कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या मार्गांचा उपयोग ५० लाखांहून अधिक मुंबईकरांना होईल. शिवाय ५० हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध होईल, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले.मेट्रोच्या या पाच मार्गांमुळे रेल्वेच्या डब्यातील गर्दी ३५ ते ४० टक्क्यांनी कमी होईल. अपघात कमी होतील. रस्त्यावरील वाहनांत ३५ ते ४० टक्क्यांनी घट होईल. प्रवासाच्या वेळेत ३० ते ५० मिनिटे बचत होईल. ध्वनी आणि वायुप्रदूषणात घट होईल. दररोज १० लाख लीटर इंधनाची बचत होईल.- प्रवीण दराडे, अतिरिक्त महानगर आयुक्त, एमएमआरडीए
मेट्रोचे १२४ किलोमीटरचे जाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2016 2:16 AM